Lok Sabha Election 2024 Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : ओवेसी लढवणार बिहारच्या 11 जागा; इंडिया आघाडीच्या मतांना सुरुंग लावणार?

Chetan Zadpe

Bihar News : खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम (AIMIM) पक्षाने बिहारमधील लोकसभेच्या 11 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांचा पक्ष आरजेडीसह इंडिया आघाडीची चिंता वाढणार आहे. ओवेसींचा पक्ष बिहारच्या किशनगंज, अररिया, कटिहार, पूर्णिया आणि इतर जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. (Lok Sabha Election 2024)

गेल्या काही वर्षांत राज्यातील मुस्लिमबहुल भागात ओवेसी यांचा बराच प्रभाव दिसून आला आहे. एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अख्तरुल इमाम किशनगंज मतदारसंघातून उमेदवार असतील. इमाम प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, 'AIMIM ने इंडिया आघाडीत सामील होण्याचा प्रयत्न केला. पण, पुढे काहीच न झाल्याने आमची निराशा झाली. त्यामुळे आम्ही एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिहारमधील 11 जागांवर ओवेसी यांचा पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे. यामध्ये किशनगंज, अररिया, कटिहार, पूर्णिया, दरभंगा, बक्सर, गया, मुझफ्फरपूर, उजियारपूर, करकट आणि भागलपूर यांचा समावेश आहे. अख्तरुल इमान हे किशनगंजमधून, तर आदिल हसन यांना कटिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने इतर जागांवरही आपले उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत, ओवेसींना मान्यता मिळताच त्यांच्या नावांची घोषणा करण्यात येईल. (Latest Political News)

एआयएमआयएमचे आमदार अख्तरुल इमान यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, "आमच्या पक्षाने बिहार आणि देशात धर्मनिरपेक्ष मते विखुरली जाऊ नयेत यासाठी खूप प्रयत्न केले. आघाडीत सहभागी होण्याचा आमचा मानस होता, पण हे शक्य झाले नाही." (Asaduddin owaisi News)

इंडिया आघाडीची मतं विभागली जाणार का?

एआयएमआयएमने बिहारमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर महाआघाडीच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. मुस्लिमबहुल सीमांचल भागात ओवेसींच्या पक्षाचा बराच प्रभाव आहे, गेल्या विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमने (AIMIM) या प्रदेशात 5 जागा जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, नंतर त्यांचे चार आमदार राजदमध्ये दाखल झाले.

याशिवाय ओवेसींनी (Asaduddian Owaisi) विविध पोटनिवडणुकांमध्ये आरजेडीच्या मुस्लिम मतांमध्येही सुरुंग लावला. बिहारमधील मुस्लिम समाज हा लालूप्रसाद यादव यांच्या राजदचा मूळ मतदार मानला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत ओवेसींनी अल्पसंख्याक मतदारांवर लक्ष केंद्रित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. याचा फायदा त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT