Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
देश

राज्यपालांनी इशारा दिला अन् 24 तासांतच मोदी सरकारचा मोठा निर्णय

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज कृषी कायद्यांवर यू-टर्न घेतला आहे. मागील वर्षभरापासून तीन कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे मोदींनी हे कायदे मागे घेण्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी याबाबत कालच इशारा दिला होता. यानंतर 24 तासांतच मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज्यपाल मलिक हे मागील काही दिवसांपासून मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर उघडपणे टीका करीत आहेत. कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवरही त्यांनी सरकारला सुनावले होते. मलिक काल (ता.18) म्हणाले होते की, शेतकरी आंदोलनामुळे भाजपला उत्तर प्रदेशात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसणार आहे. हे आंदोलन वर्षभर सुरू असून, आतापर्यंत यावर तोडगा निघायला हवा होता. नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये होते तेव्हा शेतकऱ्यांच्या हित पाहणारे होते. परंतु, आता देशाचा प्रवास अशा दिशेने सुरू आहे की शेतकऱ्यांशी चर्चाच बंद झाली आहे. आंदोलनात मृत्यू होणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल मोदींनी कधीही शोकसंदेश जाहीर केला नाही. शेतकरी येथून मोकळ्या हाताने उठून घरी जाणार नाहीत. त्यांनी 3-4 वर्षे राहावे लागले तरी ते येथे राहतील.

राज्यपाल मलिक यांनी काल इशारा दिल्यानंतर 24 तासांतच आज मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला. पुढील वर्षाच्या सुरवातीला उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. या घटनेचा मोठा परिणाम आगामी निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपकडून डॅमेज कंट्रोल मोहीम सुरू झाली आहे. यामुळे सत्यपाल मलिक यांचा इशारा सूचक मानला जात होता. अखेर मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेऊन शेतकरी आंदोलन शमवण्याचे पाऊल उचलले आहे.

देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. या वेळी बोलताना मोदी म्हणाले, शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. या महाअभियानात देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले होते. याचा उद्देश देशातील शेतकऱ्यांना अधिक ताकद मिळावी, उत्पादनाची योग्य किंमत आणि विक्रीचे पर्याय मिळावेत, असे होते. यावर संसदेत चर्चा झाली, नंतर हे कायदे आणले. देशातील कानाकोपऱ्यातील कोट्यवधी शेतकरी, अनेक शेतकरी संघटनांचे याचे स्वागत केले. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो.

मी आज देशवासियांची क्षमा मागत सत्य आणि पवित्र मनाने सांगू इच्छितो की, बहुतेक आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. दिव्याच्या प्रकाशाएवढे सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. आज गुरूनाक देवजींचे पवित्र प्रकाशपर्व आहे. ही वेळ कुणालाही दोष देण्याची नाही. मी पूर्ण देशाला सांगायला आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायद्यांना परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस ससंदेत तिन्ही कृषी कायद्यांना परत घेण्याची संवैधानिक प्रक्रिया पूर्ण केले जाईल. आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपआपल्या घरी जावे, शेतात जावे, कुटुंबात जावे. या नवीन सुरूवात करूया. नव्याने पुढे जाऊ, असे आवाहनही मोदींनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT