Morena Train Accident : महाराष्ट्रातील जळगांव ते परांडा रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती मध्य प्रदेशातील मध्य प्रदेशातील मुरैना येथे झाली आहे. उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेनंतर घाबरलेल्या प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. आणि त्याचवेळी समोरून आलेल्या पाताळकोट एक्सप्रेसने तीन महिला आणि एका बालकाला धडक दिल्याने या चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मुरैना जिल्ह्यातील हेतमपूर रेल्वे स्थानकाजवळ घडली असून घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान 2025 साली 22 जानेवारी रोजी अशीच घटना महाराष्ट्रातील जळगांव ते परांडा रेल्वे स्थानकादरम्यान घडली होती. या दुर्घटनेत देखील अशाच अफवेनं प्रवाशांचा बळी गेला होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुरैना जिल्ह्यातील हेतमपूर रेल्वे स्थानकाजवळ रविवारी (ता.14) संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली. सायंकाळी सुमारे 4 वाजता उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस मुरैनाहून धौलपूरच्या दिशेने जात होती. यावेळी हेतमपूर स्थानकाजवळ रेल्वेच्या जनरल डब्यात आग लागल्याची अफवा पसरली.
या अफवेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि जीव वाचवण्यासाठी घाबरलेल्या प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून खाली उड्या मारल्या. त्यावेळी त्यांना समोरून येणाऱ्या पातालकोट एक्सप्रेस ट्रेनने धडक दिली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच बचाव आणि मदतकार्य सुरू केले. यावेळी तीन महिलांचा आणि एका लहान मुलाचा मृतदेड ताब्यात घेण्यात आला तर काही प्रवासी जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. तर या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेनंतर आता रेल्वे प्रशासनाकडून अपघात नेमका कशामुळे झाला, अफवा कशी पसरली आणि प्रवाशांनी रेल्वेतून उड्या का मारल्या याचा सखोल तपास केला जात आहे. तर या अपघातावर रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण देत अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार या घटनेनंतर रेल्वे अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला माहिती दिली असून बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच रविवारी सायंकाळी 4.15 वाजता हेतमपूर-धौलपूर रेल्वे मार्गावर खजुराहो-उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस धावत होती. या एक्सप्रेसच्या जनरल डब्यातील एका प्रवाशाने अलार्म चेन ओढली. आणि रेल्वे मध्येच थांबली.
ज्यानंतर लगेच काही प्रवाशांनी खाली उडी मारली आणि शेजारी असणाऱ्या रुळावर धाव घेतली. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या फिरोजपूर-सीवनी पातालकोट एक्सप्रेसने तीन महिलांसह एका लहान मुलाला धडक दिली. ज्यात या प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाचे दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्रीतील रेल्वे अपघात
या घटनेनंतर आता महाराष्ट्रीतील रेल्वे अपघाताची घटना ताजी झाली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील परधाडे (परांडा) रेल्वे स्थानकाजवळ घडली. या दुर्घटनेत गाडीला आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी धावत्या पुष्पक एक्सप्रेसमधून खाली उड्या मारल्या होत्या. तर सुमारे 11 ते 13 प्रवासी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली चिरडले गेले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.