IAS Sanjeev Khirwar
IAS Sanjeev Khirwar sarkarnama
देश

'आयएएस आधिकाऱ्याच्या बदलीवर खासदार संतापल्या; म्हणाल्या दिल्लीतील कचरा इकडे नको!'

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : दिल्लीतील त्यागराज क्रीडांगणावर कुत्र्याला फिरविण्यासाठी खेळाडू व प्रशिक्षकांना सायंकाळी वेळेआधी मैदानाबाहेर काढण्याचा खेळ संजीव खिरवार (Sanjeev Khirwar) व त्यांची पत्नी रिंकू दुग्गा (Rinku Dugga) या आयएएस दांपत्याला (IAS Officer) महागात पडला आहे. खिरवार यांची सपत्नीक तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांना लदाखमध्ये तर दुग्गा यांना अरूणाचल परदेशात पाठविण्यात आले आहे.

दुग्गा यांची अरूणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) बदली करणे हा त्या राज्याचा अपमान असल्याची टीका तृणमूल कॉंग्रेसच्या (Trinamool Congress) खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांनी केली आहे. दुग्गा यांची केंद्राने अरुणाचल प्रदेशात बदली केली. ईशान्य भारताबाबत पोकळ सहानुभूती दाखवणाऱ्या केंद्र सरकारला अरूणाचल प्रदेश हा 'दिल्लीतील कचरा' टाकण्यासाठी कचऱ्याचा ढिगारा वाटतो का? असा सवाल त्यांनी केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू व अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गृह मंत्रालयाद्वारे अरुणाचल प्रदेश बरोबर कचऱ्याच्या ढिगासारखा वागणूक केल्याबदद्ल विरोध करावा, असेही मोइत्रा यांनी म्हटले आहे.

दिल्ली-लदाख ३४०० किमी !

खिरवाल पतीपत्नीच्या बदलीची बातमी जाहीर होताच सोशल मिडीयावर दिल्ली ते लदाख किती किलोमीटर अंतर आहे हे पाहणाऱ्यांची झुंबड उडाली. अधिकृत माहितीनुसार दिल्ली व लदाख यांच्यातील अंतर ३ हजार ४५८ किमी आहे. रस्त्याने गेले तर हे अंतर जाण्यास सध्या ६५ ते ७० तास लागतात. विमानाद्वारे सलगपणे हा प्रवास नाही व तो करण्यासाठीही किमान २०-२२ तास लागतात. दिल्ली-लदाख विमानाचे तिकीट प्रत्येकी २० ते २५ हजार रूपये इतके आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत. दोघेही पतीपत्नी १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या त्यागराज मैदानात रोज सायंकाळी साडेसहाला मैदानाचे सुरक्षारक्षक येथे सराव करणाऱ्या खेळाडू व प्रशिक्षकांना बाहेर हाकलून देत. कारण खिरवाल दांपत्याला कुत्र्याला पिरविण्यासाठी येणार आहेत. असे हे सुरक्षारक्षक बिनदिक्कतपणे सांगत.

आदी रात्री साडेआठ-नऊपर्यंत सराव करायला मिळत असे. मात्र, आता साडेसहा-सातलाच आपल्याला मैदानाबाहेर जावे लागते, अशी तक्रार खेळाडू व प्रशिक्षकांनी केली होती. तब्बल एक आठवडा याबाबतची पाहणी करून खातरजमा केल्यावर याबाबत वृत्त प्रसिध्द झाले. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. गृह मंत्रालयाने दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागविला. तो त्यांनी त्वरित सादर केला. खिरवाल यांनी याबाबत सारवासारव केली व या आरोपाचा इन्कार केला. तरी आपण कुत्र्याला फिरविण्यासाठी या मैदानावर जातो हे त्यांनी मान्य केले.

दिल्लीसह केंद्रशासित प्रदेशांतील आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्या यांचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. त्याचवेळी मैदानाच्या देखरेखीचे काम असलेल्या दिल्ली सरकारनेही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सारी मैदाने खेळाडूंसाठी रात्री १० पर्यंत खुली रहातील असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्रालयाने या वृत्ताची गंभीर दखल घेऊन खिरवार यांना काल चौकशीसाठी पाचारण केले होते. सुरक्षा रक्षक, खेळाडू व प्रशिक्षक यांच्या चौकशीत खिरवार यांच्याविरूध्द या तक्रारीत तथ्य आढळले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT