Narendra Modi Lok Sabha Speech  Sarkarnama
देश

Narendra Modi Lok Sabha Speech : अविश्वास प्रस्तावावरील उत्तराच्या भाषणातून मोदींनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

उत्तम कुटे

New Delhi : केंद्रातील एनडीए सरकारवर आणलेला अविश्वास प्रस्ताव हा संकट नाही,तर संधी समजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यातून विरोधकांवरच निशाणा साधला. या प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी गुरुवारी (ता.१०) सव्वादोन तास केलेल्या भाषणातून २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.या निवडणुकीचा अप्रत्यक्ष प्रचारच केला.

कॉंग्रेसच्या राजवटीत दहानंतरच्या नंबरात असणारी देशाची अर्थव्यवस्था आपल्या काळात पाचव्या स्थानी कशी आणली हे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.येत्या पाच वर्षात २०२८ पर्यंत ती तीन नंबरवर नेऊ,असे सांगत एकप्रकारे पुन्हा निवडून येऊ, असा ठाम विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारत हा विकसित देश झालेला असेल, असा दावाही त्यांनी केला.पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणारी कॉंग्रेस व गांधी घराण्याच्या उणीवा दाखवून देत निवडणूक प्रचाराची सुरवातच त्यांनी केली.

मुख्य राजकीय प्रतिस्पर्धी कॉंग्रेस आणि गांधी घराणे हेच त्यांचे मुख्य लक्ष्य होते.त्यांच्यावर निवडणूक प्रचारात केले जाणारे आरोप मोदींनी आजच केले. त्यांच्या राजवटीतील त्रूटी सांगितल्या. दुसरीकडे गेल्या सव्वानऊ वर्षातील एनडीएच्या काळात झालेला विकास कथन केला. मुख्य स्पर्धक राहूल गांधींचाच नाही,तर त्यांच्या पुर्वजांवरही देश तोडल्यासारखे गंभीर आरोप त्यांनी करीत देशवासियांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून आगामी लोकसभा निवडणुकीला मतांची बेगमी करण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट झाला.आपल्यामुळे देशाचा विकास झाला, तर कॉंग्रेसमुळे देश भकास कसा झाला,याचा पाढा वाचत त्यांनी प्रचाराचे रणशिंगच फुंकले.सबका साथ,सबका विकास ही आपली बांधीलकी (कमिटमेंट) असल्याचे सांगत मतदारांच्या भावनेला हात घातला.

मणिपूरच नाही,तर ईशान्य भारताचा कॉंग्रेसने विकास कसा अडवला ते मोदींनी सांगत मणिपूरच्या हिंसाचारामुळे बसणारी धग कमी करण्याचा प्रयत्न केला. विरोधक मणिपूर हिंसेचे राजकारण करीत असल्याचे सांगत पुन्हा त्यांनी त्यांची कोंडी केली. तसेच तेथे हिंसाचार हा न्यायालयाच्या निर्णयानंतर उफाळल्याचे सांगत त्यात केंद्र सरकार दोषी नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

ईशान्य भारत हा जिगर का टुकडा आहे, असे सांगत तेथे निर्माण झालेल्या समस्यांची जननी कॉंग्रेस असल्याचे सांगून त्यांनी पुन्हा मुख्य प्रतिस्पर्धी पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.केंद्रातील कॉंग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी मिझोराम या ईशान्य भारतातील राज्यावर हवाई दलामार्फत कसा हल्ला केला हे सांगत त्या भागात कॉंग्रेसविषयी सहानुभूती ताज्या घडामोडीनंतर मिळणार नाही,याची काळजी घेतली.भारतमाताच नाही,तर वंदे मातरमचेही कॉंग्रेसनेच कसे तुकडे केले हे सांगत तरुणांतील देशभक्तीला त्यांनी साद घालत त्यांच्या मनात कॉंग्रेस विरोध पेटवण्याचा प्रयत्न केला.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT