Sharad Pawar
Sharad Pawar sarkarnama
देश

भाजपचे तेरा आमदार पक्ष सोडणार; शरद पवारांनी टाकला बॉम्ब

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपला जोरदार धक्के बसण्यास सुरूवात झाली आहे. एकाच दिवशी एका मंत्र्यासह चार आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पण पुढील काही दिवसांत दररोज भाजपमधील नेते पक्ष सोडतील. भाजपचे तेरा आमदार व काही नेते पक्ष सोडणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे.

शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत हा दावा केला. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये समाजवादी पक्षा (SP) सोबत राष्ट्रवादी निवडणूक लढवणार असल्याचेही पवार यांनी यावेळी जाहीर केलं. तसेच गोवा (Goa) व मणिपूरमध्येही राष्ट्रवादी उमेदवार उतरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. उत्तर प्रदेशातील ओबीसींचे मातब्बर नेते म्हणून ओळख असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर तासाभरातच तीन आमदारांनीही राजीनामा दिल्याने भाजपमध्ये मंगळवारी खळबळ उडाली.

उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींविषयी बोलताना पवार म्हणाले, उत्तर प्रदेशातील चित्र बदलत असून तिथे परिवर्तन होणार आहे. लोकांना बदल हवा आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपचा राजीनामा दिला ही सुरूवात आहे. त्यांच्यासोबत 13 आमदार व इतर काही नेते पक्ष सोडणार आहेत. पुढील काही दिवसांत आणखी नेते भाजप सोडून परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी होतील. दररोज एक नवीन चेहरा दिसेल, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, भाजपच्या (BJP) उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह बडे मंगळवारी (ता. 11) दिल्लीत दाखल झाले आहे. त्यानंतर काही तासांतच चार आमदारांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मौर्य यांनी भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक मानले जाणारे आमदार रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती व भगवती सागर या आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. तिघेही मौर्य यांच्याप्रमाणेच समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मौर्य हे ओबीसी नेते असल्याने उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. इतर तीन नेतेही भाजपची डोकेदुखी वाढविण्याचे संकेत आहेत.

दरम्यान, योगी आदित्यनाथ मंगळवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी दिल्लीत पाऊल ठेवताच पहिला मोठा धक्का बसला. दिल्लीत उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. पुढील एक दोन दिवसांत नावांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. काही विद्यमान आमदारांची तिकीटे कापली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपला आणखी धक्के बसू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT