<div class="paragraphs"><p> Supriya Sule</p></div>

Supriya Sule

 

Sarkarnama 

देश

खासदार सुळे आणि सावंत यांचे लोकसभेत टोकदार भाषण : आर्यन खानचा मुद्दा उपस्थित

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : बॉलीवूडला लक्ष्य करणे तसेच आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणात कायद्याचा गैरवापर या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभेत सत्ताधाऱ्यांवर संयुक्त हल्ला चढवला.


अमली पदार्थ व मनःभ्रमकारी पदार्थ (दुरुस्ती) विधेयक २०२१ म्हणजेच एनडीपीएस कायद्यातील दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान शिवसेनेने बॉलिवूडची बदनामी झाल्याचा आरोप केला, तर ड्रग्ज सापडले नसतानाही एखाद्याला ३० दिवसांपर्यंत तुरुंगात ठेवण्याचा कायद्याचा गैरवापर एनसीबीच्या अधिकाऱ्याकडून झाल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसने केला.

अमली पदार्थांची तस्करी आणि त्यासाठीच्या आर्थिक मदतीच्या गुन्ह्याला शिक्षेची तरतूद करणाऱ्या कलमातील त्रुटी सुधारण्यासाठी एनडीपीएस कायदा दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत चर्चा झाली. २९ खासदारांनी या चर्चेत भाग घेतला होता. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या चर्चेला उत्तर दिले. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने २०१७ मधील आदेश आणि त्यानंतर त्रिपुरा उच्च न्यायालयाचा आदेशाचा संदर्भ देत अर्थमंत्र्यांनी फौजदारी कायद्यातील पूर्वलक्षी प्रभावाने दुरुस्तीचे समर्थन केले.

तत्पूर्वी, या चर्चेत बोलताना एनडीपीएस कायद्यातील चौकशी आणि गुन्हे दाखल करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना अरविंद सावंत यांनी सत्ताधारी भाजपवर बोचरी टीका केली. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून असे चित्र निर्माण केले की महाराष्ट्र अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचा अड्डा बनला आहे आणि एनसीबी त्यावर कारवाई करत आहे. यावरून घाणेरडे राजकारण खेळण्यात आले. चित्रपट उद्योगावर प्रचंड प्रमाणात हल्ले झाले. बिहारच्या निवडणुकीत भाजपने सुशांतसिंह राजपूतची छबी लावून "न भुलेंगे, ना भुलने देंगे" प्रचार केला. अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आपण गंभीर आहोत काय, असा सवाल सावंत यांचा होता.

सावंत म्हणाले, की एखादी व्यक्ती चूक असेल तर त्यासाठी संपूर्ण सिनेउद्योगाला बदनाम करण्यात आले, संपूर्ण सिनेउद्योग उत्तर प्रदेशात घेऊन जायचे सांगितले जाते. पण सर्वाधिक गुन्हेगारीचे प्रमाण उत्तर प्रदेशात, ईशान्य भारतात असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल सांगतो. मात्र, राजकारण केले जात आहे. कायद्यातील तरतुदींचा चुकीचा वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांना संरक्षण दिले जाते हे किती योग्य आहे. मादक पदार्थांच्या प्रमाणावर ते बाळगण्यावरून होणाऱ्या शिक्षेचा उल्लेख करताना अरविंद सावंत म्हणाले, की अफगाणिस्तानातून गुजरातच्या मुंद्रा बंदरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा आला त्याची एक ओळ बातमी आली नाही आणि तिथे पाच ग्रॅम अमली पदार्थ सापडलेही नाहीत, मात्र दररोज बातम्यांचा रतीब चालला.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जोरकसपणे मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या, ``एनडीपीएस तांत्रिक चुकीच्या दुरुस्तीसाठी संसदेमध्ये चार तासांची चर्चा झाली. परंतु वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकावर थोडीही चर्चा झाली नाही हा केवढा विरोधाभास आहे. देशभरात अमली पदार्थ सेवनाबाबतची मोठ्या प्रमाणात आकडेवारी असताना महाराष्ट्रातील फक्त बॉलिवूडला का लक्ष्य केले जाते? मोजक्या लोकांमुळे संपूर्ण बॉलिवूडला लक्ष्य करण्यात आले. परंतु बॉलिवूड हा उद्योग असून कोट्यवधींचा रोजगार त्यावर अवलंबून आहे. बॉलिवूडची जागतिक पातळीवर दखल घेतली जाते. त्यात केवळ झमगगाट नाही तर मेहनत आहे. याच सरकारने बॉलिवूड अभिनेत्यांना घेऊन सामाजिक संदेश प्रसाराचा प्रयत्न केला आहे. असे असताना बॉलिवूड वाईट कसे?``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT