Nitishkumar, narendra modi, tejswi yadav sarkarnama
देश

Nitishkumar : नितीशकुमारांना 'कमळा'शिवाय करमेना; तीन वेळेस संसार मोडूनही चौथ्यांदा प्रेमात !

Sachin Waghmare

Political News : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पलटी मारण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वी त्यांनी सर्वप्रथम 1994 मध्ये जनता दलापासून फारकत घेत समता पार्टी तयार केली. त्यानंतर 2003 मध्ये जनता दल युनायटेड (जेडीयू)ची निर्मिती केली. त्यानंतर 2005 मध्ये भाजपसोबत युती केली होती.

नितीशकुमार 2000 मध्ये ते पहिल्यांदाच सात दिवसांसाठी बिहारचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते 2005 पासून बिहारमध्ये सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. 2000 पासून ते आतापर्यंत 24 वर्षे उलटून गेली आहेत. जीतनराम मांझी मधल्या काळात काही महिन्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री होते. आतापर्यंत त्यांनी आठ वेळा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, तर रविवारी (28 जानेवारी) ते नवव्यांदा शपथ घेत आहेत. मधल्या काळात भाजपसोबतचा संसार तीन वेळेस मोडून चौथ्यांदा सलगी केली आहे.

2005 मधील विधानसभा निवडणुकीपासून जनता दल (युनायटेड) नितीशकुमार यांचे एकहाती वर्चस्व आहे. भाजप नेते अरुण जेटली यांनीच 2005 मधील निवडणुकीपूर्वी नितीशकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे आणण्याची कल्पना सर्वप्रथम मांडली होती. त्यानंतर 2005 ते 2010 दरम्यान बिहारमध्ये बदल घडवून आणत नितीशकुमार (Nitishkumar) यांनी ताकदीने बळ दिले. नितीशकुमार यांनी 2005 मध्ये भाजपसोबत आघाडी करून पहिले सरकार स्थापन केले होते.

त्यानंतर 2010 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. त्यानंतर 2013 मध्ये त्यांनी भाजपशी काडीमोड घेतली. त्यावेळी जनता दल (युनायटेड), भाजपची 17 वर्षांची युती तुटली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कारण, त्या पदासाठी तेदेखील इच्छुक होते. नितीशकुमार यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक एकट्याने लढवली, पण त्यात त्यांना मोठे यश प्राप्त झाले नाही.

2014 मध्ये निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या पडझडीची जबाबदारी घेत नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्रिपद सोडले आणि जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवले. एकेकाळी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या लालूप्रसाद यादव (Laluprasad yadav) यांच्या राजदच्या पाठिंब्याने ते ‘फ्लोअर टेस्ट’मध्ये टिकून राहिले. 2015 मधील विधानसभा निवडणुकीत ‘महागठबंधन’ने दणदणीत विजय मिळवला आणि नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदावर पुन्हा दावा केला. तेव्हा आरजेडीला लोकांचे बहुमत प्राप्त असताना 20 नोव्हेंबर 2015 मध्ये नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले.

त्यानंतर ‘सीबीआय’ने लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोप केल्यानंतर नितीशकुमार यांना प्रतिमेची चिंता होती. त्यांनी 2017 मध्ये पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुन्हा ‘एनडीए’मध्ये जात मुख्यमंत्रिपद पटकावले. 2020 मधील विधानसभा निवडणुकीतही तेच झाले. बिहारमध्ये भाजपा मोठा भाऊ होत असल्याची चिंता नितीशकुमार यांना वाटू लागली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर त्यांनी 9 ऑगस्ट 2022 मध्ये भाजप आणि जनता दलाची (युनायटेड) युती पुन्हा तोडत शपथ घेतली. राजदच्या पाठिंब्याने त्यांच्या पक्षाला विधानसभेत पुन्हा एकदा बहुमत मिळाले आणि तेव्हापासून नितीशकुमार त्यांच्या मुख्यमंत्रिपदावर होते. त्यांचे हे सरकार सुमारे 17 महिने चालले. त्यानंतर 28 जानेवारी 2024 ला राष्ट्रीय जनता दलासोबतची आघाडी तोडत दशकात चौथ्यांदा पक्ष बदलून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा दावा नितीशकुमार यांनी केला आहे. ते यानिमित्ताने आठव्या वेळेस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत पुन्हा नवव्यावेळेस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत.

वीज मंडळातील नोकरी सोडून केला राजकारणात प्रवेश

नितीशकुमार यांनी बिहार अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली आणि विद्यार्थीदशेतच राजकारणात प्रवेश केला. मात्र, सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी त्यांना बिहार राज्य विद्युत मंडळात नोकरी मिळाली. काही दिवस काम केल्यानंतर त्यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला.

दोनवेळा झाला होता पराभव

1977 मध्ये जनता पक्षाच्या उमेदवारीवर हरनौत मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर अपक्ष भोलाप्रसाद सिंह या जागेवरून विजयी झाले होते. 1980 मध्ये त्यांनी याच जागेवरून जनता पक्षाच्या (सेक्युलर) उमेदवारीवर निवडणूक लढवली आणि अपक्ष अरुणकुमार सिंह यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. याच जागेवर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी लोकदलाकडून 1985 ची निवडणूक लढवली आणि काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून ते आमदार झाले. त्यानंतर त्यांनी जनता दलात प्रवेश केला.

R...

SCROLL FOR NEXT