<div class="paragraphs"><p>omicrom&nbsp;</p></div>

omicrom 

 

Sarkarnama 

देश

ओमिक्राॅमचे भारतात फक्त 400 रुग्ण तरी अख्खा देश धास्तावलाय!

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : ‘डेल्टा’पेक्षा कित्येक पटींनी वेगाने पसरणाऱ्या ‘ओमिक्रॉन’ (Omicrom) या नव्या कोरोना व्हेरियंटची भारतातील रूग्णसंख्या अवघ्या आठवडाभरात ४०० च्या घरात पोचली आहे. लसीकरण आवश्यकच आहे, पण ‘ओमिक्रॉन’ला रोखण्यासाठी बूस्टर डोस हा एकमेव उपाय ठरू शकत नाही, या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मताशी सहमती दर्शवत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, नियमांचे प्रत्येकाने कसोशीने पालन करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषद घेत देशातील परिस्थितीबाबत माहिती दिली. भूषण आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, ओमिक्रॉन हा वेगाने पसरणारा आहे. विशेषतः ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना फार पटकन संसर्ग होतो. ओमिक्रॉनच्या संक्रमणाचा वेग पाहता आरोग्य यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर आहे. त्यामुळे, गर्दी करणे, आरोग्य नियम न पाळणे हे सारे तत्काळ सोडून देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

देशांतील १७ राज्यांत सध्या ३५८ ओमिक्रॉनबाधित असून रूग्ण आहेत आणि त्यापैकी ११४ बरे झाले आहेत. संसर्ग झालेल्यांपैकी ८७ जणांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, तर तिघांनी बूस्टर डोसही घेतले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्ज

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी केंद्राने जय्यत तयारी ठेवल्याचे सांगून आरोग्य सचिव भूषण म्हणाले की, सध्या १८ लाख विलीनीकरण बेड आणि चार लाख ९४ हजार ३१४ ऑक्सिजन सिलिंडर जोडलेले बेड उपलब्ध आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनचा देशात पुरेसा साठा असून दररोज १८ हजार मेट्रिक टन उत्पादनाची क्षमता देशाने विकसित केली आहे.

प्रवास बंदी नाही

सरसकट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास बंदीला जागतिक आरोग्य संघटनाही अनुकूल नाही, असे सांगून भूषण यांनी तशा प्रस्तावाबाबत भारत अनुत्सुक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आपण संसर्गाच्या बाबतीत देशांची ‘धोका असलेले’ आणि ‘धोका नसलेले’ अशी दोन गटांत विभागणी केली आहे. त्यानुसार विदेशांतून येणाऱ्या प्रवाशांबाबतचे धोरण आखले जात आहे.

नियमपालनाची जबाबदारी राज्यांची

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत सुरू झालेल्या बड्या नेत्यांच्या निवडणूक सभा आणि त्यातील प्रचार हा ‘सुपर स्प्रेडर’ ठरणार का? तशी शक्यता असेल तर या सभा टाळण्यासाठी काय उपाययोजना प्रस्तावित आहेत, असे भूषण यांना विचारण्यात आले. केंद्र सरकारने गर्दीच्या नियोजनाची व आरोग्य नियमांच्या पालनाची जबाबदारी संबंधित राज्यांची असल्याचे सांगून हात झटकले आहेत. गर्दीबाबत केंद्राने २१ डिसेंबरला राज्य सरकारांना दिलेले दिशानिर्देश स्पष्ट आहेत व त्यात, मोठ्या सभांबाबत काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा प्रशासनाची असल्याचे नमूद केले आहे, असेही राजेश भूषण यांनी निदर्शनास आणून दिले.

ओमिक्रॉनच्या धास्तीने...

- उत्तर प्रदेश आणि हरियानामध्ये रात्रीची संचारबंदी लागू

- गुजरातमध्ये आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी

- गोव्यात कोरोना टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक

- देशात ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३५८ वर

ओमिक्रॉनचे नवे २० रुग्ण

महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे १४१० रुग्ण आढळले. त्यापैकी २० रुग्ण ओमिक्रॉनचे आहेत. या २० पैकी ६ रुग्ण पुण्यात, मुंबईत ११, साताऱ्यात दोन तर, नगरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता राज्यातल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या १०८ इतकी झाली आहे. सर्वाधिक ४६ रुग्ण मुंबईत आहेत.

राज्यातील नवे निर्बंध

आज दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे  अतिरिक्त निर्बंध असतील.

·         संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.

·         लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

·         इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील  उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

·         उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी  क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल.  अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

·         क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

·         उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील.  या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

·         याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

·         जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT