Clash between two groups in Patiala, Punjab
Clash between two groups in Patiala, Punjab Sarkarnama
देश

काल शिवसेनेतून हकालपट्टी आज अटक! तुफान राड्यानंतर पोलिसांची कार्याध्यक्षांवर कारवाई

सरकारनामा ब्युरो

चंडीगड : पंजाबमधील (Punjab) पातियाळा शहरात शुक्रवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना आणि काही शीख संघटनांचे दोन गट आंदोलनादरम्यान आमने-सामने आले होते. यावेळी दोन्ही बाजूच्या आंदोलकांकडून तलवारी घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा आणि दोन्ही बाजूने दगडफेकीचा प्रकार घडला. शहरातील काली माता मंदिराजवळ ही घटना घडली. विशेष म्हणजे त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असूनही दोन घट भिडले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली असून यानंतर शिवसेनेचे पंजाबचे निलंबित कार्यकारी अध्यक्ष हरिश सिंगला यांना अटक करण्यात आली आहे.

हरिश सिंगला यांच्यावर शिवसेनेकडूनही काल कारवाई करण्यात आली आहे. काल मोठा वाद झाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष योगराज शर्मा यांनी सिंगला यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राष्ट्रीय सचिव अनिल देसाई यांच्या आदेशानुसार सिंगला यांना निलंबित करण्यात आल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर पातियालामध्ये शुक्रवारी सायंकाळी सात ते शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी का, शुक्रवारी शिवसेनेच्या (Shiv Sena) पंजाब प्रदेश शाखेकडून एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पंजाब शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष हरीश सिंगला (Harish Singla) यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. पण पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती. हा मोर्चा खलिस्तानविरोधी असल्याचा दावा केला गेला. त्यानंतर काही शीख संघटनांनी या मोर्चाला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस उपअधिक्षक मोहित मल्होत्रा यांनी याबाबत बोलताना सांगितले की, शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हरीश सिंगलांच्या किंवा दुसऱ्या गटाकडूनही मोर्चालाही कडून परवानगी मागण्यात आली होती. पण पोलिसांनी ही परवानगी दिली नव्हती. त्यामुळे आता पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली असून काही अफवांमुळे स्थानिक स्थिती बिघडली होती.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. ही घटना दुर्देवी असून सरकार राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करेल, असं मान यांनी म्हटलं आहे. मान यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 'पातियाळामध्ये दोन गटांत झालेला वाद दुर्देवी आहे. मी पोलीस महासंचालकांशी बोललो आहे. घटनेच्या ठिकाणी आता शांतता आहे. आम्ही परिस्थितीचा सतत आढावा घेत आहोत. अशांतता पसरवणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. पंजाबमधील शांतता आणि एकोपा हे आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT