PM Modi & Shaha send a massage to utpal parrikar
PM Modi & Shaha send a massage to utpal parrikar  Sarkarnama
देश

PM मोदी, शहांचा उत्पल पर्रीकरांना निरोप; "निवडणुकीचा नाद सोडं"

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात सध्या निवडणुकीच्या तोंडावर एका मोठ्या प्रश्नाने राजकीय मैदान चांगलेच तापले आहे. हा प्रश्न म्हणजे पणजीतून भाजप कोणला तिकीट देणार? सध्याचे विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांच्यामध्ये पणजीतून तिकीट मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. तिकीट न मिळाल्यास उत्पल यांनी बंडखोरी करण्याचा इशारा देत पक्षावर दबाव तंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. (PM Modi & Shaha send a massage to utpal parrikar)

मात्र अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी उत्पल पर्रीकरांना खास निरोप दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रिकर यांच्याशी फोनवर बोलून त्यांना तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच उत्पल पर्रिकर यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दोन वेळा भेट घेतली होती. मात्र यात शहा यांनी पर्रीकर यांची तिकीट न देण्याबाबतची कारण सांगत समजूत काढली आहे. उत्पल यांनी बंडखोरी करु नये आणि पक्षाच्या निर्णयाचा आदर करावा असे शहा यांनी त्यांना सांगितले असल्याचे भाजपच्या सूत्रांकडून समजत आहे.

या बदल्यात भाजपच्या नेतृत्वाकडून उत्पल यांच्यापुढे पर्याय देखील ठेवण्यात आले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. यातील एक पर्याय म्हणजे पक्षात राष्ट्रीय पातळीवर महत्वाची जबाबदारी. उत्पल यांना यावर विचार करण्यास देखील सांगण्यात आले आहे. याशिवाय दुसऱ्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा पर्याय देखील उत्पल यांना देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र उत्पल यांना हा पर्याय मान्य नसल्यास त्यांनी "निवडणुकीचा नाद सोडावा" असे स्पष्ट मोदी आणि शहा यांनी सांगितले आहे.

गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही उत्पल यांच्या तिकीटाबाबत काही स्पष्ट संकेत दिले आहेत. आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीस म्हणाले, मनोहर पर्रिकर मोठे नेते होते, त्यांचे कार्य चांगले होते. गोव्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय हेच आम्हाला आमचे कुटुंबीय वाटतात. म्हणूनच उत्पलनेही आमच्या सोबत रहावं असे आम्हाला वाटते. तसेच जर उत्पलने पक्षाचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयाचा आदर केल्यास त्यांला चांगले राजकीय भविष्य आहे. पक्ष नक्कीच त्याच्या भविष्याचा विचार करेल. मात्र पणजीमध्ये तिकिट देण्याचा अंतिम निर्णय केंद्रिय समितीचा असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यासोबतच काल एका पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल निवडणुकीत पडल्यास दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्या प्रतिमेला धक्का पोहचण्याची भीती आहे. त्यामुळे त्याच्याबाबत आपल्याला सहानुभूती वाटत आहे, म्हणून आम्ही त्यांना मागे घेतले असल्याचे सांगितले. फडणवीस यांनी यापुर्वी देखील उत्पल यांनी आधी पक्षाचे काम करावे, नेत्याचा मुलगा आहे म्हणून त्यांना तिकीट देणे ही भाजपची परंपरा नाही, असे स्पष्ट केले आहे.

तर अंतर्गत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने देखील पणजीमधून एकमेव नाव पाठवले आहे ते 'बाबूश मोन्सेरात' यांचेच आहे. त्यामुळे आता उत्पल पर्रिकर यांना भाजपने होल्डवर ठेवले नसून त्यांना तिकिट मिळणारच नाही या गोष्टीची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे, हे स्पष्ट आहे. एकूण या सगळ्या निरोप आणि संकेतांनंतर उत्पल पर्रिकर आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT