PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
देश

निमित्त संविधान दिनाचे अन् पंतप्रधान मोदींनी लक्ष्य केलं गांधी घराण्याला!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : संविधान दिनानिमित्त (Constitution Day) संसदेत आयोजित कऱण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपले विचार मांडले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन करताना त्यांनी संविधानाचे महत्व पटवून दिले. तसेच या कार्यक्रमावर बहिष्कार घातलेल्या विरोधी पक्षांवरही शरसंधान साधले. पंतप्रधान मोदी यांनी कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव न घेता टोला लगावला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आपण ज्या रस्त्याने चाललो आहे, तो योग्य आहे किंवा नाही याचे मुल्यांकन करण्यासाठी संविधान दिन साजरा करायला हवा. आंबेडकरांनी देशाला दिलेली ही अमूल्य भेट असून त्याच्या आठवणीसाठी हा दिवस साजरा करावा. पण सध्या देश काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एका संकटाच्या दिशेने पुढे जात आहे. संविधानाला समर्पित केलेल्या लोकांसाठी, लोकशाहीचा आदर असलेल्या लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. हे संकट म्हणजे कौटुंबिक पक्ष, असं मोदी म्हणाले.

कुटुंबासाठी पक्ष, कुटुंबाचा पक्ष आणि आता पुढे बोलण्याची गरज मला वाटत नाही, असं म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबावर (Gandhi Family) शरसंधान साधले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक राजकीय पक्षांकडे पहा, हेच दिसेल. ते लोकशाहीच्या मुल्यांविरोधात आहे. संविधानाला विरोधाभासी आहे. कौटुंबिक पक्ष म्हणजे मी असे म्हणत नाही की, एकाच कुटुंबातील अनेक लोक राजकीय पक्षात येऊ नयेत. योग्यतेच्या आधारे, जनतेच्या आशिर्वादाने एकाच परिवारातील लोक राजकारणात जावेत. यातून पक्ष परिवारवादी बनत नाही. पण जर पिढ्या न पिढ्या एकच कुटुंब पक्ष चालवत असेल, पक्षाची सर्वच व्यवस्था एकच कुटुंब पाहत असेल तर ते लोकशाहीसाठी सर्वात मोठे संकट असते. आज संविधान दिनानिमित्त मी देशावासियांना आग्रह करतो, देशात जागरुकता आणण्याची गरज आहे.

जपानमध्ये एकाच कुटुंबातील लोक सत्तेत येत होते. तेव्हा कुणीतरी इतर लोकही निर्णय प्रक्रियेत असे येतील, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याला यशही मिळालं. लोकशाहीला समृध्द करण्यासाठी अशा गोष्टींची आपल्या देशातही गरज आहे. आपले संविधान भ्रष्टाचाराला परवानगी देत नाही. पण न्यायपालिकाने एखाद्याला भ्रष्टाचारी घोषित केले असेल, शिक्षा दिली असेल पण राजकीय स्वार्थासाठी त्याचा उदोउदो होत असेल, त्यांच्यासोबत ऊठबस होत असेल तर तरूणाईच्या मनातही तशीच भावना निर्माण होते. आपल्याला अशी समाजव्यवस्था निर्माण करायची आहे का?, असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला.

देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याची परंपरा सुरू करायला हवी होती. यातून तरूणाईला संविधानाची माहिती मिळू शकली असती. विविधता असलेल्या देशासाठी ही खूप मोठी ताकद आहे. पण काही लोक हे करू शकले नाहीत. पण आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीवेळी मी संसदेत यावर बोलत असताना 2015 मध्येही 26 नोव्हेंबर रोजी विरोध झाला होता. आंबेडकरांना विरोध करणं, आता देश ऐकून घ्यायला तयार नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT