<div class="paragraphs"><p>PM Narendra Modi</p></div>

PM Narendra Modi

 

Sarkarnama

देश

पंतप्रधान परत का गेले? आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यानेच सांगितलं खरं कारण

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी झाल्याच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे. शेतकरी आंदोलकांनी (Farmers Protest) रस्ता अडवल्याने पंतप्रधानांना दौरा अधर्वट सोडून दिल्लीला परतावे लागले. त्यावरून तर्कवितर्क लढवले जात असताना शेतकरी संघटनेच्या नेत्यानेच नेमकं काय घडलं, याबाबत खुलासा केला आहे.

भारतीय किसान संघाच्या (क्रांतीकारक) कार्यकर्त्यांनी पंतप्रधान जात असलेल्या मार्गावर आंदोलन केल्याचे मान्य केले आहे. पण याविषयी बोलताना संघटनेचे प्रमुख सुरजित सिंग फूल (Surjit Singh Phool) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधान येणार असलेल्या ठिकाणापासून आमचे आंदोलन आठ किलोमीटर अंतरावर सुरू होते या ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था होती. त्यामुळे पंतप्रधान हेलिकॉप्टरने येणार असल्याची माहिती आम्हाला होती, असं फूल यांनी सांगितले.

सरकारने आश्वासन देऊनही एमएसपीवर समिती स्थापन केलेली नाही. तसेच आंदोलनातील मृतांच्या नातेवाईकांनाही भरपाईचा निर्णय नाही. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होते, फूल यांनी स्पष्ट केले. आमचे आंदोलन सुरू असताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी पंतप्रधान मोदी भटिंडा येथून रस्त्याने येणार असल्याचे सांगितले. त्यांनी मार्ग सोडण्यास सांगितले होते. पण पोलीस आमच्याशी खोटे बोलत असल्याचे आम्हाला वाटले. त्यामुळे आम्ही हे ठिकाण सोडले नाही, असे फूल स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधान हेलिकॉप्टरने येणार असल्याने पोलीस आपले आंदोलन मिटवण्यासाठी खोटं बोलत आहेत, असं वाटल्याने मार्गावरून हटलो नाही, असेही फूल यांनी सांगितले. पोलिसांनी आम्हाला रोखण्याचाही प्रयत्न केला. पंतप्रधानांचा मार्ग बदलल्याचे आम्हाला माहिती नव्हते. ते रस्त्यावरूनच येणार असल्याचे माहिती असते तर रस्ता रिकामा केला असता, असेही फूल सांगण्यास विसरले नाहीत.

पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत काय घडलं?

फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून बुधवारी विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी भाजपने जय्यत तयारीही केली होती. त्याआधी पंतप्रधान मोदी हुसेनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय़ घेतला. भटिंडा येथून हा मार्ग दोन तासांचा होता.

पंजाब पोलिस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेची खात्री केल्यानंतर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा हुसेनवालाच्या दिशेने निघाल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. हुतात्मा स्मारकापासून 30 किलोमीटर अंतरावरील एका पुलावर वाहनांचा ताफा आल्यानंतर काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे लक्षात आले. त्यामुळे पंतप्रधानांना सुमारे 20 मिनिटे तिथेच थांबावे लागेल. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही मोठी त्रुटी होती, असेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT