Narendra Modi
Narendra Modi  Twitter/@ANI
देश

'पुढची २५ वर्षे देशसेवा करण्यासाठी तयार रहा': नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यांना मंत्र

मंगेश वैशपायन

PM Narendra Modi Latest news

नवी दिल्ली : सध्याचे युग निराशेचे नसून आशेचे व अपेक्षांचे युग आहे. भाजपने लोकांची विचार करण्याची पद्धत बदलली तरी मुख्य मुद्यांपासून देशाचे लक्ष विचलित करण्याकडे काही पक्षांची सारी ‘इकोसिस्टिम' काम करत आहे. त्यांच्या जाळ्यात न अडकता व ‘शॉर्ट कट' न घेता देशासमोरील मुलभूत विषयांच्या सोडवणुकीसाठी व पुढच्या २५ वर्षांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्हाला अग्रेसर रहायचे आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nanredra Modi) यांनी भाजप (BJP) नेत्यांना विजयाचा नवा मंत्र दिला.

जयपूरमधील लीला पॅलेस हॉटेलमध्ये भरलेल्या भाजपच्या राष्ट्रीय बैठकीच्या पहिल्या दिवशी मोदींनी देशभरातील १३२ पक्षनेत्यांना संबोधित केले. मोदींनी दिल्लीतूनच आॅनलाईन भाषण केले व त्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. रविवारी (ता. २१) ते या बैठकीला पुन्हा मार्गगदर्शन करणे अपेक्षित आहे.

हिंदुस्तानाचा प्रत्येक नागरिक सरकारडून काम काय केले याचा हिशोब अपेक्षित करतो. सरकार काम करत आहे हे तो पाहू इच्छितो आणि त्या कामाचे परिणामही डोळ्यादेखत झाले पाहिजेत असे सांगतो. भारतीय जनता पक्षाने लोकांच्या विचारसरणीत केलेला हा बदल सर्वांत सकारात्मक बदल आहे असे आपण मानतो असे पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले की देशवासीयांच्या आपल्याकडून वाढलेल्या अपेक्षा लक्षात घेता भाजप कार्यकर्तांनाही बदलाची प्रक्रिया आणखी गतिमान करावी लागेल.

देशात एक प्रदीर्घ कालखंड असा गेला की एकदा सत्ता आली ना, आता माल मिळाला, आरामात बसून खायचे. कसेबसे दिवस ढकलायचे हीच लोकभावना बनली होती. सरकारकडून जनतेला काही अपेक्षा ठेवण्याची सोय नव्हती आणि जनतेप्रती आपली काही जबाबदारी असते याची जाणीव त्या सरकारांनाही नसे अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेसवर झोड उठवली.ते म्हणाले की २०१४ नंतर मात्र भाजपने जनतेची ही उदासीनता व सराकारांची मानसिकता यातून देशाला बाहेर काढले आहे व लोक आज सरकारकडून ‘रिझल्ट्स' ची अपेक्षा करत आहेत. यातून देशाचे उज्वल भवितव्य मला स्पष्टपणे दिसत आहे

आत्मविश्वासाने भरलेल्या देशातील युवकांना, काहीतरी करून दाखविण्याची जिद्द असलेल्या भगिनींना-मुलींना मी पाहतो तेव्हा माझा आत्मविश्वास कित्येक पटीने वाढतो. देशाच्या जनतेच्या आशाआकांक्षा आमची जबाबदारी कित्‍येक पटीने वाढवतात. स्वातंत्र्याच्या या अमतृतमहोत्सवी वर्षात देश आपल्यासाठी पुढच्या २५ वर्षांचे लक्ष्य निर्धारित करत आहे. २१ वे शतक भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण देशवासीयांचा भाजपबद्दलचा विशेष स्नेह व वाढत्या अपेक्षा, आकांक्षा आहेत.

भाजपसाठी हीच वेळ आहे, पुढच्या २५ वर्षांतील उद्दिष्टे निश्चित करण्याची, जनतेसाठी त्यांच्या भल्यासाठी, समग्र राष्ट्रविकासासाठी निरंतर काम करण्याची. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास' हाच आमचा लक्ष्यपूर्तीचा मंत्र असला पाहिजे. मुद्यांवरून लक्ष विचलित करणाऱया पक्षांच्या प्रचाराकडे लक्ष न देता भाजप कार्यकर्त्यांनी देशाच्या समग्र विकासासाठी काम करायचे आहे.

मोदी यांनी राजस्थानच्या आगामी निवडणुकांबद्दल जाहीर भाष्य करण्याचे किमान आज तरी टाळले. तत्पूर्वी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राजस्थानातील गेहलोत सरकारवर चौफेर टीका केली. गेहलोत सरकारच्या कुशासनामुळे राजस्थानची बदनामी होत आहे. या राज्यात भाजपचे कमळ उमलावे यासाठी प्रयत्न केले जातील असे नड्डा म्हणाले. राजस्थानात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक आहे. त्याच्या आधीच राज्य भाजपमधील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे व प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांच्या गटांतील वाद पेटला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT