<div class="paragraphs"><p>PM Narendra Modi&nbsp;</p></div>

PM Narendra Modi 

 

Sarkarnama

देश

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; पंजाब सरकारनं घेतला मोठा निर्णय

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी झाल्याच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे. यावर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charajit Singh Channi) यांनी बुधवारी सुरक्षेत त्रुटी झाल्याचा आरोप फेटाळला आहे. त्यानंतर आता सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून आज विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. पण भटिंडा विमानतळावरून निघालेला पंतप्रधान मोदींचा ताफा मार्गातच आंदोलन सुरू असल्याने थांबवण्यात आला होता. सुमारे 15 ते 20 मिनिटे पंतप्रधानांना थांबावे लागले. त्यानंतर ते पुन्हा विमानतळाकडे रवाना झाले. यावरून गृह विभागाने पंजाब सरकारवर ठपका ठेवला आहे. तसेच भाजपकडूनही जोरदार टीका होत आहे.

त्यानंतर मुख्यमंत्री चन्नी यांनी बुधवारीच याबाबत खुलासा केला आहे. आता पंजाब सरकारने या संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी समितीकडून केली जाणार आहे. समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश मेहताब सिंग गील आणि राज्याचे प्रधान सचिव अनुराग वर्मा हे असतील. ही समिती तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत काय घडलं?

फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून बुधवारी विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी भाजपने जय्यत तयारीही केली होती. त्याआधी पंतप्रधान मोदी हुसेनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय़ घेतला. भटिंडा येथून हा मार्ग दोन तासांचा होता.

पंजाब पोलिस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेची खात्री केल्यानंतर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा हुसेनवालाच्या दिशेने निघाल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. हुतात्मा स्मारकापासून 30 किलोमीटर अंतरावरील एका पुलावर वाहनांचा ताफा आल्यानंतर काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे लक्षात आले. त्यामुळे पंतप्रधानांना सुमारे 20 मिनिटे तिथेच थांबावे लागेल. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही मोठी त्रुटी होती, असेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री चन्नी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी परत जावे लागले, याचे मलाही दु:ख आहे. पंतप्रधानांचा ताफा आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणापासून खूप अलिकडे थांबवण्यात आला होता. आंदोलकांना रस्त्यावरून बाजू करण्यास 10 ते 20 मिनिटांचा कालावधी लागेल याबद्दल पंतप्रधानांना कल्पना देण्यात आली होती. त्यांनी दुसरा पर्यायी मार्गही सुचवण्यात आला होता. परंतु, पंतप्रधानांनी माघारी जाणे पसंत केले.

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी नव्हती आणि त्यांच्या ताफ्यावर हल्ला होण्यासारखी परिस्थिती नव्हती. मी स्वत: मोदींच्या स्वागतासाठी भटिंडा विमानतळावर जाणार होतो. मात्र, माझ्या सोबतच्या एका व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मी मोदींच्या स्वागतासाठी जाऊ शकलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT