Nagpur political news : राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यावर नेहमीच चर्चा झडत असते. निवडणूक आटोपताच ते विदेशात निघून जातात अशी टीका भाजपच्यावतीने केली जाते. मात्र संसदेचे अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिवेशन सोडून विदेशात का जातात असा सवाल करून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिजित दत्त यांनी याचे उत्तर भाजपच्या नेत्यांनी द्यावे असा जोरदार पलटवार केला आहे.
राहुल गांधी विदेशात जातात, तिथे काय बोलतात हे दाखवले जाते. ते लपून छपून जात नाहीत, उघडपणे बोलतात. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलतात. मात्र ते विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात असा नॅरेटिव्ह तयार करण्यात आला आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी भाजपची सोशल मीडिया टीम यावर स्पेशल काम करते. ते त्यांची भाषणे मोडून, तोडून दाखवतात असा दावाही अभिजित दत्त यांनी नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना केला.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे केंद्र सरकारने फक्त नावच बदलले नाही तर गोरगरीब, दलित, आदिवासी, ओबीसी अशा 12 कोटी जनतेच्या रोजगाराची हमी काढून घेतली. केंद्र सरकार सर्व योजनांचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी करीत आहेत. यापुढे महाराष्ट्रातील मजुरांना काम देण्याचे अधिकार आता स्थानिक स्वराज्य संस्थांना राहणार नाहीत. दिल्लीच्या एसी चेंबरमध्ये बसून अधिकारी ते ठरवणार आहेत. रोजगारासाठी 90 टक्के अनुदान पूर्वी केंद्र तर 10 टक्के राज्य सरकार देत होती. आता राज्याला 40 टक्के वाटा याचा उचलावा लागणार आहे.
देशातील जवळपास सर्व राज्य कर्जबाजारी आहेत. त्यांना आणखी खर्चाच्या ओझ्याखाली या योजनेच्या माध्यमातून दाबल्या जाणार आहे. पूर्वीच्या योजनेनुसार 100 दिवस कामाची हमी दिली जात होती. त्यामुळे दोनशे ते अडीचशे रुपये दिवसाला मजुरी दिली जात होती. भाजपची सत्ता आली तेव्हापासून कामाचे दिवस 60 वर आले होते. आता शेतीचा 60 दिवसांचा हंगाम सोडून 125 दिवस काम दिले जाईल असा दावा केला जात आहे. हा दावा दिशाभूल करणार आहे.
पुन्हा एकदा श्रीमंत, जमीनदारांकडे मजुरांना अल्प मजुरीत काम करण्यास केंद्र सरकार पाडत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. नॅशनल हेरॉल्डमध्ये सीबीआय, ईडी आणि कोर्टालाही कोर्टाला कुठलाच घोटाळा आढळून आला नाही. त्यामुळे सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) याचिका फेटाळून लावली.
मात्र मोदी सरकारने एका व्यक्तीच्या पत्रावरून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी 12 वर्षे त्रास दिला. 50 तास त्यांची चौकशी केली. ईडी आणि सीबीआयचा वापर मोदी सरकार कसा आणि कशासाठी करते हे महाराष्ट्राला सांगण्याची गरज नसल्याचे दत्त म्हणाले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.