Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : 'एनडीएचे लोक I.N.D.I.A च्या संपर्कात, भाजपच्या मित्र पक्षात असंतोष'

Sudesh Mitkar

New Delhi : लोकसभा निवडणुकीच्या समाप्तीनंतर, भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन झाले आहे. पण, या निवडणुकीत भाजपला मागील वेळेच्या तुलनेत 63 जागा कमी मिळाल्या असून, पक्षाला केवळ 240 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळेच मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर ही विरोधक हे सरकार अस्थिर असल्याचे सांगत सातत्याने हल्लाबोल करत आहेत. आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी निशाणा साधला असून मोदी सरकारला आपल्या अस्तित्वासाठी 'संघर्ष' करावा लागणार असल्याचा दावा केला आहे.

4 जून रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएने सलग तिसऱ्यांदा केंद्रात लोकसभेच्या 293 जागा जिंकल्या आहेत. परंतु, भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपले बहुमत गमावले आणि केवळ 240 जागा जिंकू शकल्या, त्यामुळे सत्तेत राहण्यासाठी त्यांना छोट्या पक्षांवर अवलंबून राहावे लागले.  इंडिया आघाडीने (I.N.D.I.A.), 234 जागा जिंकून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केले. यामध्ये एकट्या काँग्रेसने 99 जागा जिंकल्या आणि या निकालाने राहुल गांधी यांना विरोधी राजकारणात आघाडीवर ठेवले.

 नरेंद्र मोदी गोटातील लोक इंडिया आघाडीच्या  (I.N.D.I.A.) संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कोणाचेही नाव न सांगता एका मुलाखतीत केला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) एक छोटीशी अडचणही अस्थिर करू शकते. यासोबतच एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या प्रादेशिक पक्षांमध्ये 'प्रचंड असंतोष' असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला अस्तित्वासाठी 'संघर्ष' करावा लागणार आहे.

एक छोटीशी गडबड, सरकार पाडू शकते 

फायनान्शिअल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले, 'मोदी सरकारचे संख्याबळ असे आहे की ते अत्यंत नाजूक परिस्थितीत आहे आणि एक छोटीशी चूक सरकारला खाली आणू शकते. त्यासाठी फक्त भाजपच्या एका मित्रपक्षालाच दुसरीकडे वळवावे लागणार असल्याचे सांगत गांधींनी खळबळ उडून दिली आहे. मात्र, राहुल गांधींनी त्यांच्या या दाव्यांवर अधिक तपशील देण्यास नकार दिला.

'भाजपची मूळ रचना धार्मिक वैमनस्य पसरवणारी आहे. या निवडणुकीत त्यांची ही  विचारधारा कोलमडली आहे. भारतीय राजकारणात  हा मोठा बदल झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी युती यावेळी संघर्ष करेल, कारण नरेंद्र मोदींसाठी २०१४ आणि २०१९ मध्ये जे काम केले ते यावेळी काम करत नाही. या निवडणुकीत 'नरेंद्र मोदींचे विचार आणि मोदींची प्रतिमा नष्ट झाली आहे.'

द्वेषाच्या राजकारणावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'तुम्ही द्वेष पसरवू शकता, तुम्ही राग पसरवू शकता आणि तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता ही कल्पना भारतीय जनतेने या निवडणुकीत नाकारली आहे. धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा भाजपचा विचार कोलमडला आहे. ते पुढे म्हणाले, 'ज्या पक्षाने गेली 10 वर्षे अयोध्येबद्दल बोलले, त्यांचा अयोध्येत सफाया झाला आहे.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT