Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra sarkarnama
देश

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींचे पोस्टर्स फाडले, 'भारत जोडो' ला गालबोट ; कॉंग्रेस आक्रमक

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांची भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) ही कर्नाटक येथे पोहचली आहे. या यात्रेला गालबोट लागले आहे. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरपैकी ४० पोस्टर्स फाडण्यात आली असल्याची घटना समोर आली आहे. यावरुन कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. (bharat jodo yatra latest news)

गेल्या दोन दिवसात हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांचे पोस्टर्स फाडण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेचा आजचा २३ वा दिवस आहे.शुक्रवारी या यात्रेने कर्नाटकमध्ये प्रवेश केला आहे.

राहुल गांधी यांच्या पोस्टर्ससोबत कॉंग्रेसच्या अन्य काही नेत्यांचेही पोस्टर्स फाडण्यात आले आहे. भारत जोडो यात्रा ही केरळमधून कर्नाटकमध्ये येत असलेल्या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. याबाबत काँग्रेसने टि्वट करीत भाजपवर निशाणा साधला आहे.

"काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे भाजपला धडकी भरली आहे. वस्तूंना कसे जोडले जाते, याची कल्पना भाजपवाल्यांना नाही. तोडफोड आणि नुकसान करणे ही भाजपची संस्कृती आहे. भारत जोडो यात्रेचे यश भाजपला सहन होत नाही. त्यांचा संताप ते पोस्टर फाडून व्यक्त करीत आहेत," असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला आगमन होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.'भारत जोडो यात्रे'च्या पार्श्वभूमीवर मुंबईतही पुढील आठवड्यात 'भारत जोडो यात्रा' काढण्यात येणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय शेकाप, सीपीआय, सीपीएम आणि जनता दलासह काही स्वयंसेवी संस्थाही यात सहभागी होणार असल्याचे मुंबई काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत निघालेल्या या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही मुंबई काँग्रेसच्या वतीने गांधी जयंतीला रविवार, २ ऑक्टोबर रोजी अशा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

मुख्य म्हणजे या यात्रेला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेनेकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. लवकरच याबाबत अंतिम घोषणा केली जाणार असल्याचे समजते. देशभरातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्न लक्षात घेता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून 'भारत जोडो यात्रे'ला सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT