BJP
BJP Sarkarnama
देश

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची जीभ घसरली अन् 24 तासांतच आली माफी मागण्याची वेळ

सरकारनामा ब्युरो

जयपूर : भाजपच्या (BJP) प्रदेशाध्यक्षांनी अर्थसंकल्पाची तुलना काळ्या नवरीशी केल्याने वाद सुरू आहे. राजस्थानचे (Rajasthan) भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया (Satish Poonia) यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना पुनिया यांची जीभ घसरली होती. या प्रकरणी अडचणीत येताच पुनिया यांनी 24 तासांतच माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

महिला आयोगानेही या प्रकरणी दखल घेतली असून, पुनिया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने यावरून भाजपसह पुनिया यांना लक्ष्य केले होते. आता पुनिया यांनी या प्रकरणी माफीनामा सादर केला आहे. ते म्हणाले की, मी राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत होते. त्यावेळी उत्स्फूर्तपणे माझ्या तोंडातून काही शब्द निघाले. खरे तर मी असे शब्द कधी वापरत नाही. माझ्या शब्दामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी मनापासून माफी मागतो.

काय म्हणाले होते पुनिया?

राज्याचा अर्थसंकल्प हा वरवरची मलमपट्टी करणारा आहे. हे म्हणजे एखाद्या काळ्या नवरीला ब्युटी पार्लरमध्ये नेऊन नंतर तिचा चांगला मेकअप करून सगळ्यांसमोर उभे करण्यासारखे आहे. यापेक्षा अधिक अर्थसंकल्पात काहीही नाही, असे पुनिया अर्थसंकल्पाबाबत पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. यानंतर पुनिया यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा आणि राजस्थान महिला आयोगाच्या अध्यक्षा रेहाना रयाज यांनी यावरून पुनियांवर जोरदार टीका केली होती. पुनिया यांच्यावर कारवाईची मागणीही त्यांनी केली होती.

पुनिया हे कायम त्यांच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मोठी प्रतिज्ञा करून खळबळ उडवून दिली होती. राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. राजस्थानमध्ये सध्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलताना पुनियांनी ही जाहीर प्रतिज्ञा केली होती. जाहीर सभेत बोलताना पुनिया म्हणाले होते की. राजस्थानमधील काँग्रेस सरकार हे तरुणविरोधी आणि शेतकरीविरोधी आहे. या सरकारला सत्तेतून घालवल्याशिवाय मी हार आणि फेटा घालणार नाही. याचबरोबर रात्रीचे जेवणही मी घेणार नाही. राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचीच सत्ता येईल.

पुनिया यांनी ही घोषणा केली असली तरी अशीच घोषणा मागील विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी केली होती. राजस्थानमध्ये 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला होता. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होईपर्यंत फेटा न घालण्याची प्रतिज्ञा केली होती. राज्यात 2018 मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर अखेर त्यांनी फेटा घातला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT