Tamil Nadu assembly politics : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी अभिनेता थलपती विजय यांच्या राजकीय यशावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. टीव्हीके (Tamilaga Vettri Kazhagam) पक्षाच्या माध्यमातून तमिळनाडूच्या राजकारणात दमदार एन्ट्री घेतलेल्या विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आणि विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी, “विजय मुख्यमंत्री झाल्याचं ऐकून मला प्रचंड धक्का बसला. मी आता राजकारणात नाही. राजकारणापासून दूर होऊन बराच काळ झाला आहे. विजय आणि माझ्यात तब्बल 28 वर्षांचं वयाचं अंतर आहे. दोन मोठ्या पक्षांविरोधात उभं राहत विजयने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली,” अशी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर थलपती विजय (Thalapathy Vijay) यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करत जुन्या आणि नव्या चेहऱ्यांची सांगड घालत प्रशासनात वेगाने निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या राजकीय प्रवासामुळे तमिळनाडूच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, रजनीकांत यांचं नावही अनेक वर्षं तमिळनाडूच्या राजकारणात चर्चेत राहिलं होतं. प्रत्यक्ष निवडणूक राजकारणात ते सक्रिय नसले, तरी त्यांच्या वक्तव्यांचा राज्याच्या राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव राहिला. 1995-96 च्या काळात तामिळनाडूच्या (Tamil Nadu) तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या विरोधात त्यांनी पहिल्यांदा उघड भूमिका घेतली होती. “जयललिता पुन्हा सत्तेत आल्या, तर देवही तमिळनाडूला वाचवू शकणार नाही,” असं विधान करत त्यांनी मोठी राजकीय खळबळ उडवली होती.
यानंतर त्यांनी DMK–Tamil Maanila Congress आघाडीला पाठिंबा दिला आणि त्या निवडणुकीत AIADMK चा मोठा पराभव झाला. पुढे 1998-99 च्या निवडणुकांमध्येही त्यांच्या भूमिकेची चर्चा झाली. 2004 मध्ये त्यांनी वैयक्तिकरित्या भाजपला मतदान करणार असल्याचं सांगितलं होतं, मात्र अधिकृत पाठिंबा जाहीर केला नव्हता. याच काळात त्यांनी मांडलेली “स्पिरिच्युअल पॉलिटिक्स” ही संकल्पना चर्चेचा विषय ठरली होती.
31 डिसेंबर 2017 रोजी रजनीकांत यांनी अधिकृतपणे राजकारणात उतरण्याची घोषणा केली होती. तमिळनाडूतील सर्व 234 विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याचा आणि स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा त्यांचा मानस होता. “व्यवस्था बदलण्याची गरज आहे,” असं सांगत त्यांनी Rajini Makkal Mandram ही संघटनात्मक तयारीसाठीची व्यासपीठ उभारली होती.
मात्र 2020 च्या अखेरीस प्रकृती बिघडल्याने आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला. वय आणि आरोग्याच्या कारणांमुळे पूर्णवेळ राजकारण शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 12 जुलै 2021 रोजी Rajini Makkal Mandram ही संघटना विसर्जित करत भविष्यात सक्रिय राजकारणात येणार नसल्याचंही जाहीर केलं.
सध्या रजनीकांत वारंवार आपण राजकारणापासून दूर असल्याचं स्पष्ट करत असतानाच, विजय यांच्या राजकीय यशावर दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रियेमुळे तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.