मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीत अडकली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पाटण्यात दाखल झालेला एफआयआर मुंबईत वर्ग करण्यासाठी रियाने दाखल केलेली याचिका अनावश्यक असल्याचे सुशांतच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
ईडीने या प्रकरणी कर चुकवेगिरीचा गुन्हा दाखला केला आहे. रियाचे चार्टर्ड अकाउंटंट रितेश शाह आणि संदीप श्रीधर यांची चौकशीही ईडीने केली होती. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत.
सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह पाच जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांचा समावेश आहे. या प्रकरणी सॅम्युएल मिरांडा याची आधी ईडीने तब्बल नऊ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. काल ईडीने या प्रकरणी रिया, शोविक यांच्यासोबत श्रुती या तिघांची चौकशी केली आहे.
पाटण्यात दाखल झालेला एफआयआर मुंबईला वर्ग करावा, अशी याचिका रियाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. यावर सुशांतचे वडील के.के.सिंह यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाचा तपास आधीच सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे एफआयआर वर्ग करण्याच्या मागणीला काही अर्थ नाही. ही एफआयआर आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे रिया हिच्या मागणीला कोणताही अर्थ राहत नाही.
सुशांत याने 14 जूनला मुंबईतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.