देश

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरसंघचालकांचे मौन 

सरकारनामा ब्युरो

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोपात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांवर स्वयंसेवकांना "बौद्धिक' दिले परंतु महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मात्र त्यांची वाणी मौनात गेली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी देशातील स्वयंसेवकांसाठी तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग रेशिमबागेत आयोजित केला जातो. यावर्षी देशभरातील 914 स्वयंसेवकांनी या वर्गात भाग घेतला. या वर्गाच्या समारोपाच्यावेळी सरसंघचालक मते व्यक्त करतात. दसरा व संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाच्यावेळी सरसंघचालक काय मते व्यक्त करतात? याकडे प्रसार माध्यमांचे लक्ष लागलेले असते. तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप गुरुवारी रात्री झाला. यावेळी नेपाळच्या लष्कराचे सेवानिवृत्त प्रमुखही उपस्थित होते. यावेळी डॉ. मोहन भागवत यांनी अनेक मुद्यांवर मते व्यक्त केली. राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मुद्यांवर सरसंघचालकांनी स्वयंसेवकांना बौध्दिक दिले. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावरही सरसंघचालकांनी आसूड ओढले. गोरक्षेचा कायदा हा कॉंग्रेसनेच आणला होता. हा इतिहासाचा दाखल देण्यास सरसंघचालक विसरले नाही. नागपुरात 100 वर्षांपूर्वी झालेल्या कॉंग्रेस अधिवेशनाचा दाखल देण्यासाठी त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला. परंतु वर्तमानकाळात महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सरसंघचालकांची भूमिका काय? याकडे प्रसार माध्यमांचे व स्वयंसेवकांचे लक्ष लागले होते. या मुद्यावर सरसंघचालकांनी मौन बाळगणे श्रेयस्कर मानले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT