Sharad Pawar  Sarkaranama
देश

Sharad Pawar News : पक्ष, चिन्ह गेल्यानं पवारसाहेबांची अशी असेल पुढची लढाई…

Rajanand More

Political News : देशाच्या राजकारणात अनेक दशके आपला दबदबा निर्माण केलेले ज्येष्ठ नेते शरद पवारांना भारतीय निवडणूक आयोगाने धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेल्याने वयाची 80 पार केलेल्या शरद पवारांना आता नव्याने पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. हा लढा तितका सोपा असणार नाही. सध्यातरी त्यांना तीन पातळ्यांवर आपली लढाई सुरू ठेवावी लागणार आहे. (Sharad Pawar News)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर पक्ष आणि चिन्हे गेल्याने शरद पवार गटासाठी मोठा धक्का आहे. निवडणुकीसाठीचा कालावधी खूप कमी राहिल्याने या वेळेत राज्यभरात आपला नवा पक्ष आणि चिन्ह पोहचवण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे. सोबतच सुप्रीम कोर्टाची (Supreme Court) लढाई आणि इंडिया आघाडीतील आपले महत्व शाबूत ठेवण्याची कसरतही करावी लागेल, हे निश्चित.

आधी पक्षाला नवे नाव व चिन्ह

अजित पवार गटाकडे पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्याने शरद पवार गटाला पहिले काम पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह मिळवण्याचे असेल. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तातडीने त्याबाबत कालच कळवलेही आहे. त्यानंतर शरद पवार गटाकडून आजच पक्षाची तीन नावे व चिन्ह याचे पर्याय आयोगाकडे दिले जाणार आहेत. याबाबत दिल्लीत खलबतंही सुरू आहेत. पक्षाच्या नव्या नावामध्ये ‘राष्ट्रवादी’ शब्द असेल, अशी दाट शक्यता आहे. हे नाव आधीच कानाकोपऱ्यात पोहचल्याने त्याचा फायदा होऊ शकतो.

आयोगाकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्याने ते घराघरापर्यंत पोहचवण्याचे आव्हान नेते, कार्यकर्त्यांसमोर असेल. सध्यातरी पक्षातील नेत्यांकडून शरद पवार हेच आमचा पक्ष आणि चिन्ह असे सांगत आहेत. पण निवडणूक प्रक्रियेत चिन्हाला महत्व असल्याने ते मतदारांच्या मनावर ठसवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरी लढाई सुप्रीम कोर्टात

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी कालच स्पष्ट केले आहे. पक्षाचे संस्थापक सदस्य आणि संस्थापक नेते हे केवळ शरद पवार आहेत, असे त्या म्हणाल्या. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनातील वादाबाबत सुप्रीम कोर्टाने नोंदविलेल्या निरीक्षकांचा हवाला दिला आहे. विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष होत नाही, याच मार्गाने शरद पवार गटही सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडणार हे स्पष्ट आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीआधी कोर्टाचा निकाल येणार का, हा खरा प्रश्न आहे. ही लढाई खूप दिवस चालण्याची शक्यता आहे.  

इंडिया आघाडीतील ताकद कमी होणार का?

इंडिया आघाडीत शरद पवार हे महत्वाचे नेते आहेत. प्रामुख्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी पवारांची साथ मोलाची असेल. पण पक्ष आणि चिन्ह गेल्याने आघाडीतील त्यांचे महत्व कमी होणार का, या प्रश्नाचे उत्तर नाही असेल द्यावे लागेल. कारण अजित पवार गटाने वेगळी चूल मांडल्यानंतर आघाडीतील काँग्रेससह शिवसेना (उध्दव ठाकरे गट) ठामपणे शरद पवारांच्या मागे उभे राहिले आहेत. त्यामुळे आघाडीवर सध्याच्या राजकीय घडामोडींचा फारसा परिणाम होणार नाही, असेच चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT