Eknath Shinde Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest News
Eknath Shinde Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest News Sarkarnama
देश

शिवसेनेच्या खासदारांपुढे तीनच पर्याय; संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच ठरणार रणनीती?

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : संसदेच्या (Parliament) पावसाळी अधिवेशनातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या 39 आमदार आहेत. आता पक्षातील 14 खासदारही त्यांच्या गटात जाणार असल्याचे समजते. शिंदे गटाच्या बैठकीला हे खासदार ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते. यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Shiv Sena Latest News)

एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार बाहेर पडल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलं. पण त्यांना शिवसेनेकडून शिंदे गटातील 16 खासदारांवर अपात्रतेची कारवाईची मागणी केली. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तानाट्य थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचलं. शिवसेना कुणाची, हा प्रश्नही निर्माण झाला आहे. आता खासदारही बंडाच्या पवित्र्यात असल्याने शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.

खासदारांना शिंदे गटाला पाठिंबा द्यायचा असल्यास संसदेत वेगळा गट करून संसदेत तशी नोंद करावी लागेल, हा पहिला पर्याय 14 खासदारांकडे असेल. किंवा शिवसेनेत राहूनच शिंदे गटाला समर्थन देता येऊ शकते. पण त्यांना पक्षाचा व्हीप लागू होऊ शकतो. त्यामुळे संसदेत पक्षाच्या भूमिकेविरोधात मतदान करता येणार नाही. लोकसभेतील प्रतोद राजन विचारे यांनीही या खासदारांना साथ दिल्यास त्यांचा मार्ग अधिक सुकर होईल. विचारे यांच्या व्हीपचे सर्वच खासदारांना पालन करावे लागेल. त्यामुळे राज्याप्रमाणे संसदेतही भाजपला पाठिंबा देता येऊ शकतो.

दरम्यान, आमदारांपाठोपाठ आता खासदारांनाही फोडण्यासाठी दिल्लीतून कुटील डाव रचला जात असल्याची कबुलीच खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिली आहे. शिवसेना फोडण्याचे षडयंत्र दिल्लीतून रचले जात असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊतांनी हे आरोप केले आहेत. प्रत्येकाच्या कारवायांबाबत आमच्याकडे माहिती आहे. कोण कुठे जातो, कोण कुणाला भेटतो हे माहिती आहे. काही जणांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिली आहेत. आमचा नाईलाज आहे, आम्हाला ओढलं जातंय. आमच्यावर दबाव आहे, असं या खासदारांचं म्हणणं आहे. काहींनी मेसेज पाठवले आहेत, असं राऊतांनी सांगितलं.

खासदारांवर चौकशीचा, ईडीचा, आयटीचा दबाव टाकले जात आहेत, हे सत्य आहे. पन्नास खोके तर आमदारांपर्यंत चालले होते. तर खासदारांसाठी आणकी दहा खोक्यांचा भाव वाढल्याचे कानावर आले आहे. खासदारांना अमिष दाखवले जात आहे. सर्व खासदारांना आम्ही व्हीप बजावलेला आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, त्यामुळे कुणावरही आजतरी संशय नाही, असंही राऊत म्हणाले.

संसदेच्या अधिवेशनात कट शिजतोय, अशा बातम्या ऐकायला येत आहेत. काही खासदारांशी चर्चा झाली आहे. आजही तीन खासदारांशी चर्चा झाली. कोणत्या ना कोणत्या छोट्या मुद्यावर पकडायचं आणि दबाव टाकायचा, हे दुर्दैवी आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेत फुट पाडायची आणि उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याचा कुटील डाव आहे. काही जण त्याला दुर्दैवाने बळी पडतात, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

चारच खासदार ठाकरेंसोबत?

दरम्यान, शिंदे गटातील आमदारांची मुंबईत बैठक सुरू असून या बैठकीला जवळपास 14 खासदार ऑनलाईन सहभागी असल्याचे समजते. गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत आणि राजन विचारे वगळून इतर सर्व खासदार शिंदे गटात सामील झाल्याची सूत्रांची माहिती त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT