Sonia Gandhi, Rahul Gandhi  sarkarnama
देश

काँग्रेसला सेनापतीच नाही तर लढायचे कसे?

सरकारनामा ब्युरो

पुणे : पंजाबमधील राजकारणात सध्या होत असलेल्या घडामोडींवर (punjab congress crisis) शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून भाष्य करण्यात आले आहे. कॉग्रेसमध्ये सुरु असलेली उलथापालथ याबाबत 'सामना'च्या अग्रलेखातून त्याचा आढावा घेतला आहे. ''पंजाबातील गोंधळात भाजपचा हात आहे तसा काँग्रेस नेतृत्वाचाही गोंधळ आहे. काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही व हंगामी स्वरूपाचे काम सुरू आहे. पंजाबात दलित मुख्यमंत्री करून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एक जोरदार पाऊल टाकले ते त्यांच्या प्रिय सिद्धूने अडकवले. काँग्रेस पक्षात मूळच्याच बोलघेवड्यांची कमी नसताना सिद्धूसारख्या उपऱ्या बोलघेवड्यांवर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती. पंजाबातील गोंधळाचे पडसाद आता इतर राज्यांतही उमटू शकतात,'' असे अग्रलेखात नमूद केले आहे. मोठी बातमी : बॅँक परीक्षा आता मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये होणार

काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली हे मान्य, पण काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष द्या. पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचे कसे? ही जुन्याजाणत्या काँग्रेसवाल्यांची मागणीही चुकीची नाही. काँग्रेस पक्षात नेता कोण, हा प्रश्न आहेच. गांधी परिवार आहे. पण नेता कोण? अध्यक्ष कोण? याविषयी भ्रम असेल तर तो दूर करायला हवा. एखादा बडा नेता पंजाबात जाऊन बसेल व मामला खतम करेल असा कोणी आहे काय? असा सवाल 'सामना'तून उपस्थित करण्यात आला आहे.

''काँग्रेस श्रेष्ठींनी कॅ. अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले. नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि त्यांचे नवे मंत्रिमंडळ सत्तेवर आले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी या बदलानंतर पेढे वाटले. आनंदाने त्यांनी भांगडा केला, पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढील संकट वाढवले आहे. सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅ. अमरिंदर यांना दूर केले गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले?

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात

  • पंजाबप्रमाणेच राजस्थानमध्येही नेतृत्वबदल होईल व मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही जावे लागेल अशी हवा निर्माण झाली होती. ती पंजाबमुळे थंड पडली.

  • वाडा पडका झाला असला तरी त्यातील खिडक्या, दरवाजे, पंखे, पलंग, झुंबरांवर मालकी हक्क सांगून त्या वाड्यातच ते पथारी पसरून बसले आहेत.

  • राहुल गांधी वाड्याची डागडुजी करू इच्छितात. वाड्यास रंगरंगोटी करु पाहतात, गळकी भोके बुजवू पाहतात.

  • जुने लोक राहुल गांधींना ते करु देत नाहीत. राहुल गांधींना रोखण्यासाठी हे लोक आतून भाजपसारख्या पक्षाशी हातमिळवणी करतात हे आता पक्के झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT