<div class="paragraphs"><p>Narendra Modi</p></div>

Narendra Modi

 

sarkarnama

देश

आता तरी मौन सोडा, खासगीकरणाचा ‘कोंबडा’ रोज आरवतोयं ; शिवसेनेचा टोमणा

सरकारनांमा ब्यूरो

मुंबई : केंद्र सरकारच्या विविध योजना, उपक्रम यांच्यावर विरोधक नेहमीच टीका करीत असतात. आता भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. 'वरुण गांधी यांच्या टीकेकडे तरी मोदी सरकारनं लक्ष द्यावे,' असा टोमणा शिवसेनेनं (shivsena )लगावला आहे.

सर्व कंपन्या खासगी झाल्या तर सर्वसामान्यांच्या मुलांना नोकऱ्या कश्या मिळतील, असा प्रश्न वरुण गांधी यांनी नुकताच एका कार्यक्रमात उपस्थित केला होता. यावर 'सामना'च्या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. ''खासगीकरणाच्या सरकारी धोरणावर सडकून टीका करणारे भाजपाचे खासदार वरुण गांधी यांच्या टीकेकडे तरी केंद्रातील मोदी सरकारने लक्ष द्यावं,'' असं अग्रलेखात म्हटल आहे. भाजपचेच एक खासदार वरुण गांधी (varun gandhi) यांनीही त्यावरूनच स्वपक्षाला घरचा आहेर दिल्याने मोदी सरकारवर टीका होत आहे.

“मोदी सरकारनं (Modi government) विविध सरकारी उपक्रम आणि बँकांच्या खासगीकरणाचा धडाकाच लावला आहे. त्यावरून विरोधकांसह सर्वच पातळ्यांवर टीका होत असली तरी केंद्रातील सत्ताधारी त्यावर सोयिस्कर मौन बाळगून आहेत. बोलायचेही नाही आणि जे करायचे आहे ते सोडायचेदेखील नाही, असेच एकंदरीत केंद्र सरकारचे खासगीकरणाबाबतचे धोरण आहे. मात्र आता भाजपचेच एक खासदार वरुण गांधी यांनीही त्यावरूनच स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे. सरकारचे खासगीकरणाचे आणि ई-कॉमर्सचे धोरण देशविरोधी असून खासगीकरणामुळे कोटय़वधी लोकांचे रोजगार धोक्यात आले आहेत, असे वरुण गांधी म्हणाले.

“वरुण गांधी हे नेहरू-गांधी परिवारातील असले तरी ते भाजपाचे खासदार आहेत. त्यांच्या आई मनेका गांधी यादेखील बरीच वर्षे भाजपाच्याच खासदार राहिल्या आहेत. मोदी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषविले आहे. त्यामुळे वरुण गांधी यांची टीका त्यांच्या पक्षधुरिणांना झोंबणारी नक्कीच आहे. राहुल गांधी यांची टीका ‘राजकीय’ वगैरे असल्याची बतावणी भाजपावाले नेहमीच करीत असतात. मग आता त्यांच्याच पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी केलेल्या टीकेबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे?,” असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. ''आता तरी मौन सोडा. कारण तुम्ही कितीही झाकायचा प्रयत्न केलात तरी खासगीकरणाचा ‘कोंबडा’ रोज आरवतोच आहे, हे तरी लक्षात घ्या,” असे अग्रलेखात म्हटलं आहे.

शिवसेना काय म्हणते..

  • वरुण गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे, मुद्द्यांचे काय? पक्षाचे धोरण म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असे काही ठरले असेल तर तो भाजपाचा पक्षांतर्गत मामला आहे.

  • वरुण गांधी काय किंवा इतर काय, त्यांनी वस्तुस्थितीला धरून केलेल्या टीकेवर तरी काही टिप्पणी कराल की नाही?,” असं सवाल विचारण्यात आलाय.

  • खासगीकरणाच्या धोरणावरून उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकार म्हणून तुम्ही जनतेला द्यायलाच हवीत.

  • सामान्य जनतेच्याही मनात सरकारी कंपन्यांच्या या ‘बंपर सेल’बाबत हेच प्रश्न आहेत.

  • विरोधक काय किंवा सुब्रमण्यम स्वामी, वरुण गांधी यांच्यासारखे भाजपाचे ‘स्वपक्षीय निंदक’ काय, हे जनतेच्या मनातील खदखदच चव्हाट्यावर मांडत असतात.

  • सोयिस्कर मौन बाळगायचे असे धोरण सध्या केंद्रातील सरकारचे आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT