Ashish Mishra
Ashish Mishra File Photo
देश

निवडणुकीच्या तोंडावर भाजप अडचणीत! मंत्र्याच्या मुलावर तब्बल 5 हजार पानांचं आरोपपत्र

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) हा पूर्वनियोजित कट असल्याचे म्हटले आहे. यात केंद्रीय मंत्र्याचा मुलगा मुख्य आरोपी असल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप अडचणीत आला आहे. आता या प्रकरणी 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

एसआयटीने हा हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष काढला आहे. या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याच्यावर आधी खुनाचा गुन्हा दाखल आहे. हा कट असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत एसआयटीने या प्रकरणाची सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयात अहवाल सादर केला होता.

या प्रकरणी एसआयटीने तब्बल 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. लखीमपूर खीरीतील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात मोठमोठ्या पेट्यांतून हजारो पानांचे हे आरोपत्र आणण्यात आले. या पेट्यांना दोन-दोन कुलुपे लावण्यात आली होती. आरोपपत्र दाखल केल्याला तपास अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. आशिष मिश्राने 3 ऑक्टोबरला 4 शेतकरी आणि एका पत्रकाराला चिरडले होते. यानंतर झालेल्या हिंसाचारात तीन जण ठार झाले होते. त्यातील दोन भाजपचे कार्यकर्ते होते.

लखीमपूर खीरी येथे 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने (Ashish Mishra) हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक झाली आहे. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, मोहित त्रिवेदी, रांकू राणा, धर्मेंद्र आणि लवकुश राणा यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यातील 4 शेतकरी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT