CJI N. V. Ramana, UP Political News Updates,
CJI N. V. Ramana, UP Political News Updates,  Sarkarnama
देश

सरन्यायाधीशांचा दणका! विजयानंतर लगेचच योगी सरकार अडचणीत

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून पुन्हा सत्ता काबीज केली आहे. भाजपच्या विजयाचा जोरदार जल्लोष सुरू असताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने लखीमपूर खीरीत शेतकऱ्यांना चिरडले होते. आता या प्रकरणातील साक्षीदारांना धमक्या दिल्याचे समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयात याची माहिती देण्यात आली आहे. सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी याची गंभीर दखल घेऊन या प्रकरणी सरकारला निर्देश दिले आहेत. (UP Political News Updates)

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याची जामिनावर सुटका झाली आहे. यानंतर तो पुन्हा अडचणीत आला आहे. आशिषने उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे शेतकऱ्यांना चिरडले होते. त्याच्या विरोधात आता मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने विधिज्ञ प्रशांत भूषण हे मैदानात उतरले आहेत.

या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारावर हल्ला करण्यात आला आहे. भाजप पुन्हा सत्तेत आला असून, तुम्हाला बघून घेऊ, अशा धमक्या हल्लेखोरांनी दिल्या आहेत. राज्यात भाजपचा पुन्हा विजय झाल्यानंतर या प्रकरणातील साक्षीदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असा दावा भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. याची गंभीर दखल सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी घेतली. या प्रकरणी त्यांनी राज्य सरकारला म्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे. तसेच, या प्रकरणातील साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलण्यासही सरन्यायाधीशांनी बजावले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २४ मार्चला होणार आहे.

आशिषला उच्च न्यायालयाने 10 फेब्रुवारीला जामीन मंजूर केला होता. याला आता लखीमपूर खीरीतील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश याचिका कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही. उत्तर प्रदेश सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायला हवे होते. राज्य सरकारने हे पाऊल न उचलल्यामुळे आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागत आहे.

लखीमपूर खीरी येथे गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी 13 जणांना अटक झाली होती. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, मोहित त्रिवेदी, रांकू राणा, धर्मेंद्र आणि लवकुश राणा यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT