<div class="paragraphs"><p>Lockdown</p></div>

Lockdown

 

Sarkarnama

देश

कोरोनाचा कहर! देशात संपूर्ण लॉकडाऊनचे चक्र पुन्हा सुरू

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Corona) संसर्ग वाढीचा वेग आता चांगलाच वाढला असून दुसऱ्या लाटेचा विक्रमही मोडित निघाला आहे. ओमिक्रॉनमुळे (Omicron) हा संसर्ग वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीच स्पष्ट केले आहे. देशात तिसरी लाट (Third Wave) आली असून, केंद्र सरकारसह राज्ये निर्बंध घालू लागली आहेत. पूर्ण लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करणारे तमिळनाडू (Tamilnadu) हे पहिले राज्य ठरले आहे.

तमिळनाडू सरकारने उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने दर रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असेल. नागरिकांनी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी धार्मिक स्थळी जाता येणार नाही. याचबरोबर रेस्टॉरन्ट, मॉल आणि दुकानेही हे तीन दिवस बंद असतील. दर रविवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि मेट्रो सेवा बंद असेल.

सरकारने विवाहासाठी 100 व्यक्ती आणि अंत्यविधीसाठी 50 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा घातली आहे. सर्व सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मासळी आणि भाजी बाजार हे गर्दी टाळण्यासाठी दुसरीकडे हलवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालये वगळता सर्व महविद्यालये, तंत्रशिक्षण संस्था बंद करण्यात राहणार आहेत. बस, रेल्वे आणि मेट्रोमध्ये क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांनाच परवानगी देण्यात आली आहे.

भारतात बुधवारी सुमारे 91 हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 6.43 टक्क्यांवर पोहचला असून मृत्यूदरही वाढला आहे. बुधवारी 24 तासांत 325 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सक्रीय रुग्णांची संख्या 2 लाख 85 हजाराच्या पुढे गेली आहे. तर बुधवारी सुमारे 19 हजार 200 रुग्ण बरे झाले. सध्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.81 टक्के एवढे आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव (Dr. Balram Bhargav) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सध्या वाढत असलेल्या संसर्ग ओमिकॉनमुळे वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये सध्या वेगाने वाढ होत आहे. प्रामुख्याने महानगरांमध्ये रुग्णसंख्या अधिक आढळून येत आहे. ता. 30 डिसेंबर रोजी पॉझिटिव्हिटी दर 1.1 टक्के एवढा होता. आता हा दर पाच टक्क्यांवर गेला आहे.

देशात 30 डिसेंबर रोजी 13 हजार नवे रुग्ण आढळून आले होते. मंगळवारी हा आकडा 58 हजारांवर तर बुधवारी 90 हजारांवर पोहचला. 'महामारी वेगाने पसरत असल्याची ही स्थिती आहे. आर नॉट व्हॅल्यू सध्या 2.69 एवढी आहे. दुसऱ्या लाटेत जेव्हा सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते तेव्हा हा दर 1.69 एवढा होता. यावरून सध्याच्या संसर्गाचा वेग लक्षात येतो. आतापर्यंतचा हा सर्वाधिक वेग आहे,' असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT