Telangana Assembly Session
Telangana Assembly Session  Sarkarnama
देश

राज्यपाल विरुद्ध सरकार वाद पेटला; अधिवेशनात अभिभाषणाला बोलावलंच नाही!

सरकारनामा ब्युरो

हैदराबाद : विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असून, सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. अधिवेशनात अभिभाषणासाठी राज्यपालांनाच न बोलावण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने आता वाद आणखी वाढला आहे. याचा निषेध करीत अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या 3 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

तेलंगणच्या (Telangana) विधानसभेचे अधिवेशन (Assembly Session) सुरू आहे. अधिवेशनात राज्यपालांना अभिभाषण करण्यास राज्यपाल तमिलसाई सौंदरराजन यांना न बोलावण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. राज्यपालांच्या या भाषणाविनाच अधिवेशनाची कार्यवाही करण्याची थेट भूमिका सरकारने घेतली. यावरून आता सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष तीव्र झाला आहे. खुद्द राज्यपालांनीच याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.

अधिवेशनात अर्थमंत्री टी.हरीश राव हे राज्याचा अर्थसंकल्प (Budget) मांडत होते. त्यावेळी राज्यपालांना न बोलावल्याच्या मुद्द्यावरून भाजपच्या (BJP) सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. ते अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्प मांडू देत नव्हते. यामुळे अर्थमंत्र्यांनी काही वेळ अर्थसंकल्पीय भाषण थांबवले. यानंतर पशुसंवर्धन राज्यमंत्री तलासनी श्रीनिवास रेड्डी यांनी या आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. अखेर विधानसभा अध्यक्षांनी या अधिवेशन काळासाठी भाजपच्या तीन आमदारांना निलंबित केले. यात टी.राजासिंह, ए.रघुनंदन राव आणि एटला राजेंदर या तीन आमदारांचा समावेश आहे.

काँग्रेसचा सभात्याग

काँग्रेसने (Congress) विधानसभा अध्यक्षांचा निषेध करीत सभात्याग केला. अध्यक्ष हे एकाधिकारशाहीने सभागृह चालवत असून, सदस्यांचा अपमान करीत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या सदस्यांना म्हणणे मांडू देण्यात आले नाही. राज्यघटनेने सदस्यांना दिलेल्या अधिकारांची ही पायमल्ली आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

दरम्यान, अर्थमंत्री हरीश राव हे अर्थसंकल्प मांडण्यासाठी विधानसभेत जाण्याआधी हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील पेदम्मा मंदिरात पोचले. मंदिरात दर्शन घेऊन ते विधानसभेकडे रवाना झाले. यानंतर त्यांनी अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद घेऊन ते विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यासाठी पोचले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT