PM Narendra Modi| Amit Shah|
PM Narendra Modi| Amit Shah| 
देश

मोदींवर खोटे आरोप करणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी: अमित शहा

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : गुजरातमधील २००२ च्या दंगलींबाबत काही स्वयंसेवी संस्था व प्रसारमाध्यमे यांची अभद्र युती झाली व तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर राजकीय सूड बुध्दीने आरोपांची राळ उडवण्यात आली. शंकराप्रमाणेच मोदी यांनी तब्बल १९ वर्षे खोट्या आरोपांचे ‘हलाहल' शांतपणे प्राशन केले पण आता पुन्हा एकदा सत्य सोन्याच्या झळाळीने चमकून निघाले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाचे स्वागत केले. ज्यांनी मोदींवर खोटे आरोप केले त्यांचा ‘अंतरात्मा‘ असेल तर त्यांनी आता मोदींची व भाजप नेत्यांची जाहीर माफी मागावी अशीही मागणी त्यांनी केली.

गुजरात दंगलींबाबत एसआयटीने मोदींना दिलेली क्लीन चीट न्यायालयाने नुकतीच कायम ठेवली. जाकिया जाफरी यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर दंगलकाळात गुजरातचे गृहमंत्री राहिलेले शहा यांनी एका खासगी वृत्तसंस्थेशी बोलताना यावर भाष्य केले. ते म्हणाले की, 'राजकीय सूडाच्या भावनेतून करण्यात येणाऱ्या आरोपांची वेदना सहन करताना मोदींना मी जवळून पाहिले आहे. ‘न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आमची बाजू सत्य असली तरी आम्ही काहीही बोलायचे नाही ही त्यांची भूमिका होती. एखादा मजबूत मनाची व्यक्तीच असे धाडस दाखवू शकते.'

लष्कराचे मुख्यालय दिल्लीत आहे. याच दिल्लीत हजारो शीखांची कत्तल झाली तेव्हा ३ दिवस काहीही कारवाई झाली नाही. त्या नरसंहार याबाबत किती एसआयटी स्थापन झाल्या ? आमचे सरकार आल्यावर आम्ही एसआयटी स्थापन केली. आता हेच लोक आमच्यावर खोटे आरोप कसे करतात ? असेही प्रश्न शहा यांनी केले.

शहा म्हणाले की, '२००२ मध्ये झालेली दंगल रोखण्यासाठी लष्कर बोलावण्यात तत्कालीन मोदी सरकारने कोणताही दिरंगाई केली नव्हती. २८ फेब्रुवारीला दंगल उसळली व १ मार्चला लष्कराला पाचारण करण्यात आले. मात्र, याप्रकरणी मोदींवर बिनबुडाचे आरोप करण्यात आले. तिस्ता सटेलवाड यांच्या एनजीओने चुकीचे आरोप केले व अशा एनजीओ आणि प्रसार माध्यमे यांच्या अभद्र युतीने अत्यंत चुकीचे चित्र निर्माण केले होते. तेव्हा गोळीबारात फक्त मुस्लिमांचा मृत्यू झाल्याची बाब कोर्टानं देखील अमान्य केली आहे. हिंदूंना जाळल्याच्या घटनेचा निषेधही कोणी केला नाही.

नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचार प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून सुरू असलेली चौकशी व कॉंग्रेसजनांची आंदोलने यावर उपरोधिक टीका करताना शहा म्हणाले की, 'मोदींचीही चौकशी झाली, तपास झाले. खोट्या आरोपांतूनच मला अटकही करण्यात आली होती. पण तेव्हा कोणी धरणे निदर्शने केली नाहीत. आम्ही कायद्याला साथ दिली,' असंही अमित शहा यांनी यावेळी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT