Tripura Election :
Tripura Election :  Sarkarnama
देश

Tripura Election : त्रिपुरामध्ये 81% वोटींग : मतदान दरम्यानच्या १० ठळक घडामोडी काय?

सरकारनामा ब्यूरो

Tripura Election : ईशान्येतील त्रिपुरा राज्यासाठी विधानसभेसाठी गुरुवारी (16 फेब्रुवारी) कडेकोट बंदोबस्तात मतदान पार पडले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. राज्यातील ३ हजार ३३७ मतदान केंद्रांवर मतदान झाले. त्रिपुरा निवडणुकीत एकूण 259 उमेदवार रिंगणात होते. 1100 मतदान केंद्रे संवेदनशील आणि 28 अतिसंवेदनशील म्हणून ओळखली गेली. महिला कर्मचार्‍यांनी 97 मतदान केंद्रे सांभाळली. जाणून घ्या त्रिपुरा निवडणुकीच्या मतदानाशी संबंधित मोठ्या गोष्टी.

1. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी दुपारी 4 वाजेपर्यंत 81 टक्के मतदान पार पडले. राज्यात निवडणुका निकोप, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी 31,000 मतदान कर्मचारी आणि केंद्रीय दलाचे 25,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सशस्त्र पोलिस आणि राज्य पोलिसांचे 31,000 कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

2. मतदानादरम्यान शारीरिकदृष्ट्या अपंग आणि वृद्ध मतदारांसाठी विशेष पावले उचलण्यात आली होती. त्यांना मतदान केंद्रांवर कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्रिपुरा विधानसभा निवडणूक-2023 मध्ये ट्रान्सजेंडर मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केले.

3. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी आगरतळा येथे मतदान केले. यावेळी ते म्हणाले की, “आम्हाला शांततेत मतदान हवे आहे. लोक मला विचारतात माझ्यासमोर आव्हान काय आहेत? अभद्र युती करून एकत्र आलेल्या प्रतिस्पर्ध्यांनी (काँग्रेस-डावे) शांतता राखली पाहिजे, हे आव्हान आहे. येथे भाजपचे सरकार निश्चितपणे स्थापन होईल, असे ते म्हणाले.

4. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी आगरतळा येथे मतदान केले. यावेळी त्यांनी धानपूरमधील मतदान केंद्राबाहेर आपल्याला काढण्यात आले, असा दावा केला. डाव्या पक्षांच्या पोलिंग एजंटवर भाजपने हल्ला केल्याचा आरोप ही त्यांनी केला. गोमती जिल्ह्यातील उदयपूरमध्ये हिंसाचाराचा आरोपही त्यांनी केला.

5. दक्षिण त्रिपुरातील कालाचेरा मतदान केंद्राबाहेर सीपीआय समर्थकाला मारहाण झाल्याची बातमीही समोर आली आहे. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांनी समर्थकाला रुग्णालयात नेले आहे. याप्रकरणी स्वत:हून दखल घेत, एफआयआर नोंदवण्यात आला आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

6. त्रिपुराच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने गुरुवारी काँग्रेस आणि भाजपच्या राज्य युनिट्स तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दिलीप सैकिया यांना ईशान्येकडील राज्यात मतदानादरम्यान ट्विटरच्या माध्यमातून मते मागण्यामुळे नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, हे ट्विट निवडणूक कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. कारण हे ट्विट मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या 48 तासांच्या प्रचार बंदी काळात करण्यात आले होते. नियमानुसार निवडणूक प्रचार संपल्यानंतर शेवटच्या ४८ तासांत कोणतेही निवडणूक साहित्य व मतांचे आवाहन करता येत नाहीत.

7. गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील जनतेला विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान होण्यासाठी मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केले.मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी त्रिपुरातील जनतेला विक्रमी संख्येने मतदान करून लोकशाहीचा सण अधिक मजबूत करण्याचे आवाहन करतो. मी विशेषतः तरुणांना त्यांच्या मताधिकाराचा वापर करण्याचे आवाहन करतो.

8. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही त्रिपुरातील जनतेला निर्भयपणे मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्रिपुरातील जनता परिवर्तनासाठी एकजूट असल्याचे खरगे यांनी ट्विट केले आहे. लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी, विशेषतः तरुणांनी सहभागी होऊन शांतता आणि प्रगतीसाठी मतदान करावे, असे माझे आवाहन आहे. न घाबरता मतदान करा.

9. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्रिपुरातील जनतेला समृद्ध आणि भ्रष्टाचारमुक्त राज्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. अमित शहा म्हणाले की, मी त्रिपुरातील बंधू-भगिनींना तेथे विकासाभिमुख सरकार स्थापन व्हावे आणि सुरू झालेले शांतता आणि विकासाचे वातावरण असेच, सुरू राहावे यासाठी मतदान करण्याचे आवाहन करतो. जेपी नड्डा म्हणाले की, सुशासन, विकासाचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक मत मोजले जाते आणि ते समृद्ध आणि भ्रष्टाचारमुक्त त्रिपुरासाठी निर्णायक ठरेल.

10. त्रिपुरामध्ये भाजप आणि आयपीएफटी (इंडिजिनियस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा) युती सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर डाव्या-काँग्रेस आघाडीनेही सत्ता हिसकावण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. भाजप 55 विधानसभा जागांवर निवडणूक लढवत आहे, तर त्याचा मित्रपक्ष आयपीएफटीने सहा जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर एका जागेवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. डावी आघाडी 47 तर काँग्रेस 13 जागांवर निवडणूक लढवत आहे. तृणमूल काँग्रेसने 28 जागांवर उमेदवार उभे केले असून 58 अपक्ष उमेदवारही आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT