Amit Shah
Amit Shah File Photo
देश

मोदी सरकारची कोंडी होताच अमित शहांनी फोन फिरवला अन् फिरली चक्रे

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कृषी कायद्यांवर यू-टर्न घेतला आहे. मागील वर्षभरापासून तीन कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे मोदींनी माफी मागत हे कायदे मागे घेतल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांनी हमी भावासह इतर मागण्या आता लावून धरल्याने भाजप (BJP) सरकारची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) मैदानात उतरले आहेत.

कृषी कायदे आणि त्यामुळे शेतकरी आंदोलन भाजपला चांगलेच महागात पडल्याचे चित्र आहे. भाजपने या प्रकरणी वर्षभरानंतर सपशेल शरणागती पत्करत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. तरीही शेतकरी माघार घेण्यास तयार नाहीत. शेतकऱ्यांनी हमीभाव कायद्याची मागणी लावून धरली आहे. याचबरोबर आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी मागे हटण्यास तयार नसल्यामुळे मोदी सरकारची कोंडी झाली आहे.

सरकारसमोरील ही समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता मैदानात उतरले आहेत. शहांनी काल (ता.3) रात्री शेतकरी नेत्यांना फोन केला. शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांवर चर्चा करण्याचे निमंत्रण दिले आहे. शेतकरी नेत्यांनीही याला तातडीने प्रतिसाद देत सरकारशी चर्चेसाठी पाच सदस्यीस समिती स्थापन केली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्लीच्या सिंघू सीमेवर ही बैठक झाली. आंदोलन मागे घेण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. परंतु, सरकारकडून अधिकृतपणे चर्चेचा प्रस्ताव आला नसल्याचेही शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले. तिन्ही कृषी कायदे मागे घेणारे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारने 29 नोव्हेंबरला मंजूर करून घेतले आहे.

देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी 19 नोव्हेंबरला कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. या वेळी बोलताना मोदी म्हणाले होते की, मी आज देशवासियांची क्षमा मागत सत्य आणि पवित्र मनाने सांगू इच्छितो की, बहुतेक आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. दिव्याच्या प्रकाशाएवढे सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. आज गुरूनाक देवजींचे पवित्र प्रकाशपर्व आहे. ही वेळ कुणालाही दोष देण्याची नाही. मी पूर्ण देशाला सांगायला आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायद्यांना परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT