Amit Shah and Jagdeep Dhankhar
Amit Shah and Jagdeep Dhankhar  Sarkarnama
देश

भाजपचे आमदार अडचणीत येताच अमित शहांनी थेट राज्यपालांनाच दिल्लीत बोलावून घेतलं

सरकारनामा ब्युरो

कोलकता : पश्चिम बंगालच्या विधानसभेत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपच्या आमदारांमध्ये राडा झाला. आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की करण्यासोबत हाणामारी केल्याचा प्रकार घडला. यानंतर विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या पाच आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे आमदार अडचणीत आलेले असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपाल जगदीप धनखर यांना दिल्लीत बोलावून घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

वीरभूम हिंसाचारावरुन सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. असे असतानाही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. याचे पडसाद विधानसभेतही उमटले आणि दोन्ही बाजूंच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी सुवेंदू अधिकारींसह भाजपच्या पाच आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. यानंतर अमित शहांनी (Amit Shah) राज्यपाल जगदीप धनखर यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले. आज धनखर यांनी दिल्लीत शहांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कशाबद्दल झाली, याची माहिती देण्यात आलेली नाही. पण शहांनी तातडीने राज्यपालांना बोलावून घेतल्याने राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

वीरभूममधील हिंसाचारामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचे समोर आले असून, या प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी भाजप (BJP) आमदारांनी आज लावून धरली. यामुळे विधानसभेत गोंधळ उडाला. यावर तृणमूल काँग्रेसचे (TMC) आमदारही आक्रमक झाले. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये हाणामारी सुरू झाली. हा प्रकार रोखण्यासाठी अखेर मार्शल आणि पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. यात तृणमूलचे आमदार असित मुजुमदार यांच्या नाकाला दुखापत झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विधानसभेतही आमदार सुरक्षित नाहीत

यावरून सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी आम्ही विधानसभेत चर्चा करण्याची मागणी केली होती. सरकारने आमची मागणी फेटाळून लावली. याचवेळी आम्हाला रोखण्यासाठी सरकारने साध्या वेशातील कोलकता पोलिसांना सभागृहात आणण्यात आले. आमच्या 8 ते 10 आमदारांना सभागृहातच मारहाण करण्यात आली. यात आमचे मुख्य प्रतोद मनोज तिग्गा यांचाही समावेश आहे. यामुळे आमदार आता विधानसभेत सुरक्षित नसल्याचे सिद्ध झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT