Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi Sarkarnama
देश

भाजपच्या हालचाली वाढल्या; मुख्यमंत्री योगींना दिल्लीत घेतलं बोलवून

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) घोषणा झाल्यानंतर आता भाजपच्या (BJP) हालचाली वाढल्या आहेत. पाच राज्यांपैकी सर्वात मोठं व महत्वाचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सत्तारूढ भाजपने सर्वाधिक जोर लावला आहे. त्यासाठी भाजप नेतृत्वानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना दिल्लीत बोलवून घेतलं आहे. ते उद्यापासून (ता. 11) तीन दिवस दिल्लीत मुक्कामी असतील, अशी माहिती सुत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची यादी व प्रचार याबाबत योगी आदित्यनाथ यांच्यासह पक्षनेत्यांची अत्यंत महत्वाची बैठक दिल्लीत होणार आहे. येत्या 13 जानेवारीला पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीतच पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची नावे निश्चित होणार आहेत. त्यानंतर भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर होऊ शकते. अनेक विद्यमान आमदारांची तिकीटे कापली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 10 मार्च या काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत 58 जागांवर मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्यास 14 जानेवारीपासून सुरवात होणार आहे. त्यासाठी पक्षाच्या संभाव्य उमेदवारांचीही यादी दिल्लीत घेऊन या, असे योगींसह अन्य नेत्यांना सांगण्यात आल्याचे समजते. उमेदवारी यादीतील उमेदवारांच्या नावांवर योगींचा वरचष्मा राहणार हे स्पष्ट आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कमीत कमी उमेदवारांना तिकीटे देण्याबाबतही पक्षनेतृत्वाने राज्य नेतृत्वाला सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री योगी, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह, उपमुख्यमंत्री के. पी. मौर्य व दिनेश शर्मा, संघाचे प्रतीनिधी सुनील बन्सल आदी वरिष्ठ नेते उद्या दिल्लीत दाखल होणार असल्याचे समजते. त्यांची पक्ष नेतृत्वासोबत बैठक होणार आहे. यात योगींच्या मनातील उमेदवार कोण आहेत, याचा अंदाज दिल्लीश्वरांना येईल. त्यानंतर सीईसी बैठकीत यावर विस्ताराने चर्चा होऊन पहिल्या दोन्ही फेऱ्यांच्या उमेदवारांची निश्चिती होईल.

बैठकीत पंतप्रधान मोदी कमी बोलतात

कोणत्याही निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार ठरविण्यासाठी सीईसी बैठक महत्वाची असते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही असतात. बैठकीदरम्यान प्रधानमंत्री मोदी खूप कमी बोलतात. राज्याच्या नेत्यांना प्रत्येक उमेदवाराबाबतची माहिती जास्तीत जास्त देता यावे, यासाठी फक्त राज्याच्या व अन्य नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पंतप्रदान मोदी उत्सुक असतात. त्यानंतर नावांवर चर्चाही होते. उमेदवाराचे नाव निश्चित झाल्यानंतर शक्यतो त्यात अजिबात बदल करायचा नाही, यावर मोदी व अमित शहा यांचा कटाक्ष असतो, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT