BJP
BJP Sarkarnama
देश

भाजपत खळबळ; मंत्र्याने पक्ष सोडताच तासाभरात तीन आमदारांचा रामराम

सरकारनामा ब्युरो

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तारखा जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपला जोरदार धक्का बसला आहे. ओबीसींचे मातब्बर नेते म्हणून ओळख असलेल्या मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर तासाभरातच तीन आमदारांनीही राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. आणखी काही आमदार पक्ष सोडण्याची शक्यता असल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.

भाजपच्या (BJP) उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह बडे मंगळवारी (ता. 11) दिल्लीत दाखल झाले आहे. त्यानंतर काही तासांतच चार आमदारांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मौर्य यांनी भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक मानले जाणारे आमदार रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती व भगवती सागर या आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. तिघेही मौर्य यांच्याप्रमाणेच समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मौर्य हे ओबीसी नेते असल्याने उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. इतर तीन नेतेही भाजपची डोकेदुखी वाढविण्याचे संकेत आहेत.

राजीनामा दिल्यानंतर मौर्य म्हणाले, मंत्री असताना विपरीत स्थिती आणि विचारधारेमध्ये राहून खूप काम केले आहे. मात्र दलित, मागासवर्ग, शेतकरी, बेरोजगार तरूण आणि छोटे व मध्यम व्यापाऱ्यांकडे खूप दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मी मंत्रिमंडळातून राजीनामा देत असल्याचे मौर्य यांनी स्पष्ट केलं. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थेट समाजवादी पक्षात प्रवेश केला. काही दिवसांत डझनभर आमदार पक्ष सोडणार असल्याचेही त्यांनी सांगितल्याने भाजपला आणखी धक्के बसण्याची चिन्हे आहेत.

मागील काही दिवसांपासून मौर्य हे अखिलेश यादव यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. मागील निवडणुकीत भाजपला जातीच्या राजकारणाने सत्तेत पोहचवल्याचे मानले जाते. दलित, मागासवर्गाच्या मतदानाचा टक्का अधिक असल्याने अखिलेश यादव यांनीही आता या जातींकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे भाजपमधील या नेत्यांनाही आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यातूनच मौर्य यांचा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, योगी आदित्यनाथ मंगळवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी दिल्लीत पाऊल ठेवताच पहिला मोठा धक्का बसला. दिल्लीत उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. पुढील एक दोन दिवसांत नावांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. काही विद्यमान आमदारांची तिकीटे कापली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपला आणखी धक्के बसू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT