Pushkar Singh Dhami
Pushkar Singh Dhami  Sarkarnama
देश

मुख्यमंत्र्यांची खुर्ची अखेर वाचली! विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय

सरकारनामा ब्युरो

डेहराडून : उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात भाजपने (BJP) सत्ता मिळवली होती पण मुख्यमंत्री (Chief Minister) पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांचा पराभव झाला होता. पराभूत होऊनही भाजपने त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली होती. त्यामुळे त्यांच्यासमोर पुन्हा निवडून येण्याचे आव्हान होते. ते आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेलले आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चंपावत मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. यामुळे धामी यांची खुर्ची अखेर वाचली आहे. (Pushkar Singh Dhami wins form Champawat)

धामी यांच्यासाठी काही दिवसांपासून मतदारसंघाची निवड सुरू होती. अनेक आमदारांनी मुख्यमंत्र्यांसाठी मतदारसंघ सोडण्याची तयारी दाखवली होती. यात चंपावतचे आमदार कैलाश गहतोडी यांचाही समावेश होता. अखेर पक्षनेतृत्वाने चंपावतवर शिक्कामोर्तब केले होते. चंपावत हा भाजपचा बालेकिल्ला आहे. यामुळे धामी यांच्या विजयाची भाजपला खात्री होती. धामी यांनी आता येथून 55 हजारांच्या मताधिक्यानं दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांना प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला.

उत्तराखंडमध्ये भाजपने 70 पैकी 47 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले. परंतु, त्यांचा खातिमा मतदारसंघात पराभव झाला होता. असे असले तरी ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आल्यानंतर त्यांना सहा महिन्यांत विधानसभेवर निवडून जाण्याचे आव्हान होते. अखेर हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करून धामी यांनी त्यांची खुर्ची बळकट केली आहे.

धामी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि ज्येष्ठ नेते सत्पाल महाराज हे शर्यतीत होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री निवडीसाठी आमदारांची बैठक पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. केंद्रीय मंत्री राजनाथसिंह आणि पक्षाच्या नेत्या मीनाक्षी लेखी या केंद्रीय निरीक्षक म्हणून बैठकीला हजर होते. या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी धामी यांचे नाव निश्चित करण्यात आले होते.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्रिपदी तिरथसिंह रावत आले होते. त्यांना चार महिन्यांतच जुलैमध्ये मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. नंतर त्याच महिन्यात पुष्करसिंह धामी यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी झाली. यानंतर उत्तराखंडमध्ये लगेचच विधानसभा निवडणूक होत असल्याने तोपर्यंत मुख्यमंत्री कोण नेमावा, असा तिढा नेतृत्वासमोर होता. अखेर धामी यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT