Varun Gandhi
Varun Gandhi Sarkarnama
देश

जय श्रीराम नव्हे, आता जय हिंद म्हणण्याची वेळ आलीय! वरूण गांधींचा सूचक इशारा

सरकारनामा ब्युरो

पीलीभीत : उत्तर प्रदेशातील भाजपचे (BJP) खासदार वरूण गांधी (Varun Gandhi) मागील काही दिवसांपासून सतत मोदी व योगी सरकारवर टीका करत आहेत. कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून ते सरकारला घेरत असल्याने पक्षही बुचकळ्यात पडला आहे. आता वरूण गांधी यांनी पक्षाला थेट इशाराच देऊन टाकला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आता जय श्रीराम नव्हे तर जय हिंद (Jai Hind) म्हणण्याची वेळ आली असल्याचे सूचक वक्तव्य केलं आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वरूण गांधी यांना काही दिवसांपूर्वीच डच्चू दिला आहे. पक्षाविरोधात सतत भाष्य करत असल्याने हे पक्षानं हे पाऊल उचललं असल्याची चर्चा आहे. पण त्यानंतरही वरूण यांनी आपल्याच सरकारवर टीका करणं थांबवलेलं नाही. सोमवारी तर त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना पक्षासह हिंदूत्ववाद्यांनाही थेट अंगावर घेतलं आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरूण गांधी यांचे हे सूचक वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

एका युवकाने जय श्रीरामच्या घोषणा देण्यावरून वरूण गांधी म्हणाले, आता जय श्रीरामच्या घोषणा देण्याऐवजी जय हिंद च्या घोषणा देण्याची वेळ आली आहे. सगळ्या लोकांना एकत्र करा, देशभक्तीची भावना निर्माण करा. मर्यादा पुरूषोत्तम रामही सगळ्यांना जोडण्याचे काम करत होते. आपल्या सगळ्यांना हिंदूस्तान उभा करायचा आहे.

दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या जयंतीदिवशी ज्या लोकांनी सोशल मीडियात नथूराम गोडसे (Nathuram Godse) झिंदाबादचा ट्रेंड चालवला, त्यांचा पहिल्यांदा मी विरोध केला. त्यामुळे या देशात राहत असल्याची लाज वाटते. जे महात्मा गांधीचा खूनी गोडसेचा जयजयकार करतात त्यांना फाशी द्यायला हवी. असा हल्लाबोलही वरूण गांधी यांनी केला आहे.

केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाहे, सरकारी संस्थांची विक्री केली जात आहे. हा देश कोणत्या दिशेन चालला आहे. सर्वसामान्य घरातील मुलं कुठं नोकरी करणार, त्यांच्या भविष्याचे काय होईल, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. मी याविरोधा आवाज उठवला आहे. मागील दोन वर्षांत 17 परीक्षा रद्द झाल्या आहेत. याचे उत्तर कोण देणार? आता राजकारणाची चिंता न करता देशाचा विचार कऱण्याची वेळ आली आहे, असं सूचक वक्तव्य वरूण गांधी यांनी केलं आहे.

पीलीभीतमध्ये आंदोलन करत असलेल्या अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना वरूण गांधी यांनी केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले, आज माझ्यासमोर संपूर्ण देश बसला आहे. इथे कुणी हिंदू नाही, मुसलमान नाही, ना कोणी मागास आहे. इतर धोका देऊन संपूर्ण हिंदूस्तानला कमजोर केले जात आहे. मला कुणाची सरकार आहे, याची परवा नाही. मी तुमच्या सोबत आहे. आपली ताकद दाखवून आपण आपले अधिकार मिळवू, असं आश्वासन गांधी यांनी कर्मचाऱ्यांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT