Amit Shah, Narendra Modi, Mamata Banerjee Sarkarnama
देश

Assembly Election : ममता बॅनर्जी इतिहास घडविणार की भाजप झटका देणार? ‘ओपिनियन पोल’ने वाढवले टेन्शन

West Bengal election opinion poll : तमिळनाडूमध्ये डीएमके-काँग्रेस आघाडीच पुन्हा सत्तेत बसू शकते. तर काँग्रेसने जोर लावलेल्या केरळमध्येही एलडीएफला काटावर विजय मिळू शकतो.

Rajanand More

Mamata Banerjee vs BJP : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामध्ये पश्चिम बंगाल तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांचा समावेश आहे. मात्र, सर्वाधिक उत्सुकता बंगालच्या निकालाची आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सलग चौथ्यांदा विजयापासून रोखण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.

पश्चिम बंगालमधील अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार, याचे आडाखे बांधले जात आहेत. वोटवाइब आणि सीएनएन-न्यूज १८ ने केलेल्या सर्व्हेचे अंदाज समोर आले आहेत. त्यानुसार बंगालमध्ये ममता बॅनर्जी इतिहास घडविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसचा विजय एकतर्फी असेल, असा अंदाजही सर्व्हेतून वर्तविण्यात आला आहे.

कुणाला किती जागा?

सर्व्हेनुसार, ममता बॅनर्जी यांना २९४ पैकी तब्बल १८४ ते १९४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. बहुमतासाठी १४८ हा जादुई आकडा आहे. २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र भाजपला जेमतेम ९८ ते १०८ पर्यंतचा आकडा गाठता येऊ शकतो, असा अंदाज आहे.

मतदानाच्या टक्केवारीत तृणमूलने भाजपला खूप मागे टाकल्याचे सर्व्हेमध्ये दिसते. टीएमसीला ४१.९ टक्के मते मिळतील, असा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आला आहे. तर भाजपला ३४.९ टक्के मतदारांचे समर्थन मिळू शकते. सर्व्हेमध्ये बहुतेक मतदारांनी सत्ताधारी पक्षाच्या विद्यमान आमदारांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करताना पुन्हा त्यांनाच मतदान करणार असल्याचे मत नोंदविले आहे.

दरम्यान, अन्य राज्यांमध्येही सत्ताधारी पुन्हा सत्तेत येतील असा अंदाज आहे. तमिळनाडूमध्ये डीएमके-काँग्रेस आघाडीच पुन्हा सत्तेत बसू शकते. तर काँग्रेसने जोर लावलेल्या केरळमध्येही एलडीएफला काटावर विजय मिळू शकतो. आसाममध्ये सत्ताधारी भाजपच्या बाजूने कौल मिळण्याची शक्यता सर्व्हेतून वर्तविण्यात आली आहे.

बंगालमध्ये कधी मतदान?

पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. पहिला टप्प्यातील मतदान २३ एप्रिलला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी आहे. तर ४ मेला निकाल लागणार आहे. ममता बॅनर्जी यांनी राज्यात सलग चौथ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. त्यांनी एकाचवेळी सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा करत मोठी आघाडी घेतली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT