BJP Flags
BJP Flags  Sarkarnama
देश

पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपमध्ये धुसफूस; आमदारानं पक्षाची सर्व पदं सोडली

सरकारनामा ब्युरो

कोलकता : राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) माजी प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार रिपुन बोरा यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आता पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) झालेल्या विधानसभा व लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील पराभवामुळे भाजपमध्ये (BJP) धुसफूस सुरू झाली आहे. एका आमदाराने पक्ष नेतृत्वावर बोट ठेवत पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. तर एका खासदारानेही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये आसनसोल लोकसभा व बालीगंज विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत अनुक्रमे शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) आणि बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांचा विजय झाला आहे. या पराभवानंतर भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. मुर्शिदाबाद येथील भाजपचे आमदार गौरी शंकर घोष यांनी रविवारी पक्षाच्या राज्य समितीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेत आपला मान राखला गेला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या अत्याचाराविरोधात लोक सतत लढत आहेत. पण पक्षात अशा लोकांना स्थान दिले जात नाही. पक्षाच्या लढ्यात ज्यांचा संबंध नाही, त्यांनाच महत्व दिलं जात आहे. त्यांना पदं दिली जात आहेत. अशा स्थितीत राज्य समितीत राहणे योग्य नसल्याने राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे घोष यांनी सांगितले. घोष यांच्यानंतर विष्णुपूरचे खासदार सौमित्र खान यांनीही पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला.

'भाजप पराभूत होणार, हे आधापासूनच दिसत होते. कारण बंगाल भाजपचे नेतृत्व अनुभव नसलेल्या नेत्याकडे आहे. राजकीयदृष्ट्या ते परिपक्व नाहीत,' अशी टीका खान यांनी केली. खान हे 2019 च्या निवडणुकीवेळी टीएमसी सोडून भाजपमध्ये आले होते. भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी टीएमसीकडील अनेक गोष्टी शिकायला हव्यात. आपण सुधारलो नाहीत, तर पक्ष उभारी घेणार नाही, असं खान म्हणाले.

काँग्रेसला धक्का

दरम्यान, रिपुन बोरा यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सोनिया यांना राजीनामा पाठवला आहे. यामध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकीआधी प्रदेशाध्यक्ष असताना आपण पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केला. पंचायत निवडणुकीपासून सर्व निवडणुकीमध्ये पक्षाने एकजुटीने भाजपशी लढा दिला. पण 2021 च्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. केवळ पक्षातील काही नेत्यांच्या स्वार्थापोटी पक्षाचा पराभव झाला, असा आरोप बोरा यांनी केला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीतही काही नेत्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे भाजपला दोन्ही जागा मिळाल्या. प्रदेश काँग्रेस आणि भाजप सरकार प्रामुख्याने मुख्यमंत्री हातात हात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत मी पक्षात राहू शकत नाही. भाजपच्या राजकारणामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. मी यापुढेही भाजपविरोधात लढत राहणार आहे, असं स्पष्ट करत बोरा यांनी राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT