<div class="paragraphs"><p>Mamata Banerjee </p></div>

Mamata Banerjee

 

Sarkarnama

देश

घरात कोरोना आलाय हा बाहेर हिंडतोय! ममतादीदी सख्ख्या भावावर संतापल्या

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Corona) संसर्ग वाढीचा वेग चांगलाच वाढला आहे. ओमिक्रॉनमुळे (Omicron) हा संसर्ग वाढत असून, देशात तिसरी लाट (Third Wave) आली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक निर्बंध घातले आहेत. पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी तर सख्ख्या भावालाच जाहीरपणे या मुद्द्यावर झापले आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक निर्बंध लावले आहेत. असे असतानाही त्यांचे कनिष्ठ बंधू बाबून बाहेर हिंडत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे त्यांच्या बंधूची पत्नी म्हणजेच ममतादीदींच्या वहिनी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. असे असतानाही बंधू बाहेर फिरत असल्याचे पाहून ममतांचा पारा चढला. घरात कोरोना असून, हा बाहेर हिंडतोय, असे जाहीरपणे त्यांनी झापले. दानधर्म नेहमी घरातूनच सुरू करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

घरात कोरोनाने एक जण आजारी असल्याचे बहुदा तुम्ही विसरलेला दिसताय. तुम्ही अशा प्रकारे बाहेर हिंडू शकत नाही. माझ्याच घरातील व्यक्ती असे वागते यामुळे मला राग आला आहे, असे ममतांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यात दररोजची कोरोना रुग्णसंख्या आता 14 हजारांवर गेली आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ममता संवाद साधणार आहेत. राज्यातील पॉझिटिव्हीटी दर 23 टक्क्यांवर पोचला आहे.

केंद्र सरकारच्या कोरोना लसीकरणविषयक टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.व्ही.के.अरोरा यांनीच देशात तिसरी लाट आल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी म्हटले होते की, देशातील ओमिक्रॉन रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. महानगरांमध्ये दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी 75 टक्के रुग्ण हे ओमिक्रॉनचे आहेत. मुंबई, दिल्ली आणि कोलकता या शहरांमधील 75 टक्के रुग्ण ओमिक्रॉनचे आहेत.

नॅशनल कोविड-19 सुपरमॉडेल कमिटीने तिसरी लाट नवीन वर्षाच्या सुरवातीला येईल, असा अंदाज वर्तवला होता. या कमिटीचे अध्यक्ष विद्यासागर यांनी म्हटले होते की, भारतात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. परंतु, ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. तिसरी लाट भारतात पुढील वर्षीच्या सुरवातीला येईल. ही लाट फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचेल. दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या जास्त असणार नाही. कारण की सरकारने सामान्य नागरिकांना 1 मार्चपासून कोरोना लस देण्यास सुरवात केली. त्याचवेळी नेमका डेल्टाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग सुरू होता. म्हणजेच जनतेचे लसीकरण झालेले नव्हते त्यामुळे डेल्टाचा प्रादुर्भाव झाला होता. आता लसीकरणाचे प्रमाण खूप असल्याने रुग्णसंख्या पहिल्या लाटेपेक्षा कमी राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT