सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय असताना, पूर्ण दिवस व्यग्र जातो.मात्र, रोज सकाळी नियमितपणे योगासने, व्यायाम आणि ध्यानधारणा करणे टाळत नाही. त्यातूनच दिवसभराच्या कामाचा उत्साह मिळतो. त्याचबरोबर संतुलित आहार हाच आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र आहे. जंक फूडपेक्षा घरगुती, ताजे आणि पोषक आहार घेणे खूपच उपयुक्त आहे, असे सांगत विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या निरोगी आरोग्याचे रहस्य उलगडले.
शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने सकाळी झोपेतून लवकर उठण्याची सवय आजही अंगवळणी आहे. दररोज सकाळी साधारणतः ६.३० ते ७ च्या दरम्यान उठतो. सार्वजनिक जीवनात असताना रात्री झोपेस उशीर होणे, आता नियमित झाले आहे. दिवसभर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांचा गोतावळा असताना सकाळच्या फावल्या वेळेशिवाय दुसरा वेळ नसतो.
माणसाची शारीरिक प्रकृती आणि तंदुरुस्ती, आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर योगासने, व्यायाम आणि ध्यानधारणा करण्यात माझा एक-दीड तास जातो. योगासने, व्यायाम आणि ध्यानधारणा केल्याने आजही वयाच्या या टप्प्यापर्यंत कामासाठी उत्साह मिळतो.
व्यायाम, योगासने आणि ध्यानधारणा झाल्यानंतर नाश्त्यामध्ये कसलेही ‘फास्ट फूड’, तेलकट पदार्थ न खाता शेतकरी ज्याप्रमाणे सकाळी पोटभर न्याहारी करतो, त्याचप्रमाणे ज्वारी अथवा बाजरीची भाकर किंवा गव्हाची पोळी यांच्यासोबत पालेभाज्यांचा पोटभर आहार घेतो. पोटभर जेवण झाल्यानंतरच दौऱ्याच्या कामांसाठी घराबाहेर पडतो. सार्वजनिक जीवनात असताना सातत्याने विविध कामानिमित्त आणि दौऱ्यानिमित्त घराबाहेर राहावे लागते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सकाळचे जेवण झाल्यानंतर दुपारच्या जेवणासाठी सुद्धा घरूनच डबा सोबत घेऊन बाहेर पडतो. छत्रपती संभाजीनगरव्यतिरिक्त बाहेर जिल्ह्याचा दौरा असताना, बाहेर हॉटेलमध्ये जेवण सहसा करत नाही. स्थानिक कार्यकर्त्यांच्या घरीच जेवण करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत कौटुंबिक स्नेह वाढण्याससुद्धा बळकटी मिळते. या गोष्टींमुळे कार्यकर्त्यास संघटनात्मक कामकाजासाठी एक मोठा उत्साह मिळतो.
दौऱ्यात असो अथवा नसो, सकाळी नऊ, दुपारी दीड वाजता तर रात्री सात वाजता नित्यनियमाने जेवण करतो. दररोज दौऱ्यात असताना संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा ठरतो. संतुलित आहारामुळे आरोग्य सदृढ राहते अशी माझी पक्की धारणा आहे. संतुलित आहार हाच आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र आहे. जंक फूडपेक्षा घरगुती, ताजे आणि पोषक आहार घेणे खूपच उपयुक्त आहे.
शारीरिक आरोग्यासाठी योगासने, ध्यानधारणा व व्यायाम याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे व्यायाम करणे मूलभूत बाब आहे, असे माझे ठाम मत आहे. तरूण अथवा सर्वच वयोगटांतील नागरिकांनी आपल्या सवयीप्रमाणे या तीन गोष्टी शारीरिक मजबुतीसाठी करावे.
दैनंदिन आहारात दूध, फळे, भाज्या, डाळी, अंडी यांचा समावेश करा. जेवल्यानंतर पाणी पुरेसे प्या.नियमित व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्ती दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम, चालणे, धावणे किंवा योगाभ्यास करा. मोबाईल आणि संगणकामुळे वाढलेली निष्क्रियता कमी करा, असा माझा तरुणांना सल्ला राहील.
(शब्दांकन : माधव इतबारे, छत्रपती संभाजीनगर)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.