Eknath Shinde, Chhatrapati Sambhajiraje, Devendra Fadanvis
Eknath Shinde, Chhatrapati Sambhajiraje, Devendra Fadanvis sarkarnama
कोल्हापूर

Maratha : या कारणांसाठी छत्रपती संभाजीराजेंनी केले शिंदे, फडणवीसांचे अभिनंदन...

Umesh Bambare-Patil

कोल्हापूर : मराठा विद्यार्थ्यांना शासकिय सेवेत नियुक्त्या देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यांनी माझे आझाद मैदानावर उपोषण सोडविताना दिलेले आश्वासन पाळले आहे, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी अभिनंदन करून आभार मानले आहेत.

आपल्या लढ्याला यश... शासकीय नोकऱ्यांमध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळणार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर माझे उपोषण सोडविताना दिलेले आश्वासन पाळले, अशी पोस्ट छत्रपती संभाजीराजेंनी फेसबुकवर व्हायरल केली आहे.

संभाजीराजेंनी म्हटले की, मराठा आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कोरोना महामारीमुळे शासनाने नियुक्तीपत्रे देण्यास विलंब केला. दरम्यान ९ सप्टेंबर २०२० रोजी दुर्दैवाने मराठा आरक्षणास स्थगिती आली. त्यामुळे नंतरच्या काळातही शासनाने या उमेदवारांना नियुक्ती दिली नाही. वस्तुतः कोरोना महामारीमुळे नियुक्ती देण्यास शासनाला शक्य झाले नाही, यामध्ये या निवड झालेल्या उमेदवारांचा काहीही दोष नव्हता.

त्यामुळे जीवापाड मेहनत करून मिळवलेली त्यांची हक्काची नोकरी त्यांना मिळायलाच पाहिजे होती. यासाठी या सर्व उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्याकरिता कायदेशीर पद्धत म्हणून अधिसंख्य जागा निर्माण करण्याची संकल्पना सर्वप्रथम आम्ही पुढे आणली. ही संकल्पना समाजाची मागणी म्हणून आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत २९ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत मांडली. पुढेही वारंवार त्यासाठीचा पाठपुरावा केला.

कोल्हापूर येथील मूक आंदोलनानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकारसोबत १७ जून २०२१ रोजी झालेल्या बैठकीत हा मुद्दा आम्ही मांडला होता. त्यावर त्यांनी निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांचा वेळ मागितला.मात्र, महिना उलटून गेला तरी त्या सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. म्हणून आम्ही नाशिक, नांदेड, रायगड, सोलापूर येथे आंदोलन केले, दौरे केले. मात्र, तब्बल आठ महिने सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही.

सर्व उमेदवार मात्र, वेळोवेळी मला भेटून त्यांच्या व्यथा सांगत होते. अपेक्षा व्यक्त करीत होते. शेवटी सरकारला जागे करण्यासाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये आझाद मैदान येथे मी स्वतः आमरण उपोषणाला बसलो. यावेळी, राज्य सरकार सोबत समन्वयकांची बैठक झाली असता, नियुक्त्यांच्या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चालढकल करीत होते.

मात्र, बैठकीत हा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडल्याने त्याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार व तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी सकारात्मकता दर्शवली. स्वतः मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी येऊन या मराठा उमेदवारांना आम्ही सुचविलेल्या पद्धतीनुसार अधिसंख्य जागा निर्माण करून नियुक्त्या देऊ, असे लेखी आश्वासन दिले होते.

मात्र, तरीही पुढचे चार महिने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळेस त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागील सरकारमध्ये असताना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना आठवण करून देऊन, नैतिक जबाबदारी म्हणून या आश्वासनांची पूर्तता करावी, असे निवेदन दिले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन त्यांनाही हा विषय समजावून देऊन, या उमेदवारांना त्यांचा न्याय द्यावा, अशी मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिसंख्य जागा निर्माण करून मराठा उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व उमेदवार व समाजाच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राज्य विधीमंडळ व सरकारचे आभार मानत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT