कोल्हापूर

कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव : आमदार क्षीरसागर

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव आज विधानसभेच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी ही मागणी केली होती. 

दरम्यान, राजर्षि शाहू महाराज यांना "भारतरत्न' पुरस्कार मिळावा यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे शिफारस करावी, अशी मागणी आज आमदार क्षीरसागर यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोल्हापूर विमानतळाचे "छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर' असे पुनर्नामकरण करण्याचे ठराव करण्यात आला. या ठरावाबद्दल आमदार क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. 

विमानतळास राजाराम महाराजांचे नाव हे त्यांच्या कार्यकतृत्त्वाची दखल असून कोल्हापूरसाठी ही अभिमानाची बाब आहे. राजर्षि शाहू महाराजांचे कर्तृत्व मोठे होते, मात्र त्यांचे अपुरे काम राजाराम महाराजांनी पूर्ण केले. राजाराम महाराजांनी 1935-40 या काळात विमानतळाचे काम सुरू केले. त्यांच्या हस्ते 1940 ला विमानतळाचे उद्‌घाटन झाले, त्यामुळे कोल्हापूर खऱ्या अर्थाने जगाच्या पटलावर आल्याचे श्री. क्षीरसागर यांनी यासंदर्भात प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

"भारतरत्न' हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. बहुजनांचे कैवारी, महाराष्ट्रातील करवीर संस्थानचे अधिपती, थोर समाजसुधारक, प्राथमिक शिक्षण, जातीभेद, अस्पृश्‍यता निवारण आदि सुधारणांचे पुरस्कर्ते राजर्षि शाहू महाराजांना मरणोत्तर "भारतरत्न' पुरस्कार जाहीर करण्याबाबत राज्य शासानाने प्रयत्न करावा, अशी मागणीही श्री. क्षीरसागर यांनी विधानसभेत केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT