Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar News Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar News : २०२४ नाहीतर 'या' महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका लागणार! प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

Akola : भारतीय रिझर्व्ह बँकने शुक्रवारी(दि.१९) महत्त्वपूर्ण निर्णय घेत २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून माघारी घेण्याची घोषणा केली आहे. यावेळी बँकेकडून नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

याच निर्णयावर विरोधी पक्षांकडून सडकून टीका केली जात आहे. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते व अध्यक्ष प्रकाश आंबेडकर २ हजारच्या नोटाबंदीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधतानाच लोकसभेच्या निवडणुकांबाबतही मोठं विधान केलं आहे.

मोदी सरकारकडून यापूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अचानक रात्री १२ नंतर ५०० व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा करण्यात आली होती. ३० डिसेंबर २०१६ पर्यंतच बँक खात्यात हे चलन भरता येईल असंही जाहीर केलं होतं. या निर्णयावरुन विरोधकांकडून मोदी सरकार(Modi Government)वर सडकून टीका करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. यामुळे देशातील विरोधकांकडून मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २ हजारच्या नोटाबंदीवरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंबेडकर म्हणाले, “विरोधकांना निधी मिळू नये आणि त्याचबरोबर विरोधकांकडे निधी येऊच नये, या दृष्टीने टाकलेला हा खेळ आहे. त्यामुळे येथील राजकीय पक्षाने गाफील राहू नये. ऑक्टोबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतीलच असं सूचक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

'हे' आहे २ हजारच्या नोटाबंदी मागचं कारण ?

मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या 'नोटाबंदीनंतर २०१६ साली २ हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. मात्र, इतर नोटा चलनात पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने २ हजार रुपयांच्या नोटेच्या उद्दिष्टाची पूर्तता झाली. त्यामुळे २०१८-१९ मध्ये या नोटेची छपाई बंद करण्यात आली होती. चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांपैकी ८९ टक्के नोटा या २०१७ च्या आधी बाजारात आणण्यात आल्या होत्या.

३१ मार्च २०१८ मध्ये २ हजार रुपयांच्या सर्वाधिक नोटा चलनात होत्या. याचे मूल्य सुमारे ६.७३ लाख कोटी इतके होते. मात्र, नंतर चलनात असलेल्या या नोटांची संख्या कमी झाली. ३१ मार्च २०२३ पर्यंत ३.६२ लाख कोटी रुपये मूल्य असणाऱ्या २ हजार रुपयांच्या नोटा चलनात राहिल्या. सामान्यत: व्यवहारांसाठी या नोटा वापरल्या जात नसल्याचं निदर्शनात आलं. तसंच व्यवहारासाठी लागणाऱ्या चलनाची पूर्तता इतर नोटा करत आहेत असं रिझर्व्ह बँके(Reserve Bnak Of India)ने २ हजारच्या नोटाबंदीच्या निर्णयामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT