Congress MLA Amit Deshmukh addressing media over alleged large-scale copying during Maharashtra HSC board examinations. sarkarnama
महाराष्ट्र

Amit Deshmukh On Exam : शिक्षण क्षेत्राची अधोगती, भरारी पथके हतबल; कॉप्यांचा सुळसुळाट पाहून अमित देशमुखांचा संताप!

Maharashtra HSC exam controversy : बारावी परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉपी प्रकरण उघड झाल्याने अमित देशमुख यांनी परीक्षा रद्द करून नव्याने घेण्याची मागणी केली. शिक्षण व्यवस्थेच्या अधोगतीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Jagdish Pansare

Congress News : राज्यात सर्वत्र बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. शिक्षण विभागाकडून दरवर्षी कॉपीमुक्त परीक्षांचे ढोल बडवले जातात. प्रत्यक्ष बहुतांश परीक्षा केंद्र हे 'कॉपीयुक्त' असल्याचे निदर्शनास आले आहे. अगदी पहिल्या दिवशीच परीक्षा केंद्रांवर कॉप्यांचा सुळसुळाट पहायला मिळाला आहे. यावर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी संताप व्यक्त करत परीक्षाच रद्द करा, अशी मागणी केली आहे. शिक्षण क्षेत्राची अधोगती सुरू असून आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत? असा सवालही त्यांनी केला.

परीक्षा केंद्रावरील कॉप्यांचा सुळसुळाट आणि त्यात अनेक ठिकाणी शिक्षक, केंद्रप्रमुख, संस्थाचालकांचाच सहभाग असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. शिक्षण क्षेत्रातील हे विदारक चित्र आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला हा खेळ धोकादायक आणि जीवघेणा असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत आहेत. यावर आमदार अमित देशमुख यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत परीक्षाच रद्द करा आणि एकूण व्यवस्थेचे पुनर्नियोजन करून परीक्षा घ्या, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावी बोर्ड परीक्षेला दोन दिवसापूर्वी सुरुवात झाली. दुर्दैवाने पहिल्या दिवसापासून संपूर्ण राज्यात कॉप्यांचा सुळ सुसळाट सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी कॉपीमुक्त परीक्षाकेंद्र मोहिमेचा फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

एकूणच परीक्षा केंद्रावरील गोंधळाची परिस्थिती लक्षात घेता राज्यातील शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था झाल्याचे निदर्शनास येत आहे. कधीकाळी देशात आणि संपूर्ण जगभरात महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राचा लौकिक होता. आज या क्षेत्राची झालेले अधोगती पाहून आपण कोणत्या दिशेने निघालो आहोत याची स्पष्ट जाणीव होत आहे.

स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील परीक्षांमधून होणारे गैरप्रकार आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. परीक्षा घेणार्‍या यंत्रांना आणि भरारी पथके हतबल झाल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे अभ्यासू, गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल खच्चीकरण करणाऱ्या या परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालणे अनिवार्य बनले आहे .

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने गांभीर्यपूर्वक पावले उचलत ही शिक्षण व्यवस्था दुरूस्त करणे आवश्यक आहे. कॉप्यांचा सुळसुळाट असताना अशा पद्धतीने परीक्षा घेण्यापेक्षा त्या रद्द करून या परीक्षांची नव्याने आखणी करणे, पुनर्नियोजन योग्य ठरणार असल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT