Mumbai News : लोकसभा निवडणुकीत मुंबईसह राज्यातील काही मतदान केंद्रावर उडालेल्या गोंधळानंतर निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीबाबत खूपच संवेदनशील आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्याबरोबरच, मतदान केंद्रावर मतदारांच्या सुविधेबाबत निवडणूक आयोगासमोर आव्हान आहे.
तसंच नोव्हेंबर महिन्यात सूर्यास्त लवकर होतो, त्यामुळे मतदान केंद्रावर पुरेशा उजेडासह महापालिकेतील मतदान केंद्रावरील सुरक्षितेबाबत निवडणूक आयोगाने चिंताग्रस्त आहे. यासाठी उपाययोजना करण्यावर स्थानिक प्रशासनाला निवडणूक आयोगाने सूचना केल्यात.
विधानसभा निवडणुकीचा ज्वर चढलाय. महाविकास आघाडी (MVA), महायुती, तिसरी आघाडी, मनसेसह सर्वच राजकीय संघटना मतदारांपर्यंत पोचत आहेत. राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच मतदारांना मतदान केंद्रावर आल्यानंतर तिथं योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न सुरू आहे. तसेच निवडणूक आयोग काहीसा चिंतेत देखील आहेत.
विधानसभेसाठी मतदान नोव्हेंबर महिन्यात असून या कालावधीत सूर्यास्त लवकर होतो. मतदान (Voter) प्रक्रिया सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील. तसेच केंद्रावर रांगा लागल्यास ती प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू राहील. त्यामुळे मतदान केंद्रावर पुरेशी प्रकाश हवा आहे. यासाठी मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा ठेवून कोठेही तो खंडीत होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी निडवणूक आयोगाने स्थानिक प्रशासनाला योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदारांना अडथळे येऊ नये, तशा तक्रारी येऊ नयेत, याची काळजी घेण्याचे सुचवले.
शहरी भागात मतदानावेळी गोंधळ उडतो. हा गोंधळातून वेगळाच प्रकार होतो. यावर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातील महापालिकांनी त्यांचे सर्व मतदान केंद्रांवर 100 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत. तसेच मतदान केंद्रांवर आवश्यक ते सर्व दिशादर्शक, ठिकाणदर्शक फलक असावेत.पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या इमारतीच्या ठिकाणी मतदारांना बसण्यासाठी बाकडे, खुर्च्या उपलब्ध करुन द्याव्यात. मतदानासाठी घरुन येण्यासाठी व जाण्यासाठी वाहनाची मागणी केलेल्या दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत.
निवडणूक आयोगाचे आयुक्त संजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ घेत, मुंबईसह राज्यातील काही शहरी भागात मतदानाचा टक्का कमी झाल्याकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे यंदा शहरी भागात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावे लागणार आहे. मतदारांना आपल्या मतदान केंद्राची माहिती व्हावी यासाठी सर्व साधनांचा अवलंब करावा. मतदार चिठ्ठ्यांचे 100 टक्के आणि वेळेत वाटप करावे. सर्व जिल्ह्यात ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या- नो युवर पोलिंग स्टेशन’ उपक्रम चांगल्या प्रकारे राबवा, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
मतदानाचे प्रमाण नेमके कळावे व त्यातील आकडेवारीत अधिक अचूकता यावी, यासाठी निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी विधानसभा मतदार संघस्तरावर, जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर नेमण्यात येणार आहे. बुथनिहाय पडताळणी करुन मतदान टक्केवारी अचूक देण्यात येईल, यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचेही निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.