Chandrashekhar Bawankule Sarkarnama
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : भाजपचं मिशन खेड्याकडे चलो! भाजपच्या मंत्र्यांना महिन्यातून किमान एकदा करावा लागणार खेड्यात मुक्काम

BJP's General Convention At Shirdi : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या असून भाजपसह महायुतीचा चांगले यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीने 288 पैकी 235 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला.

Aslam Shanedivan

Pune News : राज्यातील महायुतीने विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळत सत्ता काबीज केली आहे. महायुतीने 288 पैकी 235 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. तर भाजपने 133 जागा जिकंत आपण येथील प्रमुख आणि मोठा राजकीय पक्ष असल्याचे दाखवून दिले. यानंतर आता राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली असून भाजप तयारीला लागली आहे. विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी भाजपने शिर्डी येथे महाअधिवेशन भरवले आहे. या अधिवेशनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या मंत्र्यांना खेड्याकडे चलोचा नारा दिला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने साईंच्या शिर्डीत महाअधिवेशन घेतलं आहे. या महाअधिवेशनाला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्यासह राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज्यभरातून आलेल्या सर्वच प्रमुख नेते व पदाधिकारी यांना कानमंत्र दिला. यावेळी बावनकुळे यांनी भाजपच्या मंत्र्यांना महिन्यातून एकदा खेड्यात मुक्काम करावा, अशा सूचना केल्या आहेत.

नेमकं कारण काय?

बावनकुळे यांनी भाजपच्या मंत्र्यांना महिन्यातून एकदा खेड्यात मुक्काम करावा, अशा सूचना देताना याचा लाभ कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना होणार असल्याचे सांगितले आहे. तर मंत्र्यांकडून अपेक्षीत असणाऱ्या कामांचा निपटारा होण्यास यामुळे मदत मिळेल. तेथील पदाधिकाऱ्यांच्या तसेच जिल्हाध्यक्षांशी भेट होईल असे म्हटले आहे.

ओएसडीचं असेल हे कामं

खेड्यातील माणसांच्या समस्या समजून घ्यायच्या असतील तर पक्षाच्या मंत्र्यांना खेड्यात जावेच लागेल. त्यांच्याशीच संवाद साधावा लागेल. भाजपच्या प्रत्येक मंत्र्यांच्या कार्यालयात एक ओएसडी असा असेल, की जो फक्त पक्ष संघटनेशी संबंधित कामांकडे लक्ष देईल, असंही बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

जनतेची कामे झालीच पाहिजेत

तसेच हा ओएसडीचं आपल्या पक्षातील लोकांच्या कामाबद्दल मंत्र्यांना अवगत करवून देईल. यामुळे मंत्र्यांकडून कामे लवकरात लवकर होतील. पक्षाचा कार्यकर्ता आणि पक्षाचे पदाधिकारी हा आपला कणा आहे. यामुळे सामान्य माणसाशी |संबंधित महत्त्वाची कामे आपल्याकडून झालीच पाहिजेत, असेही बावनकुळे म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्षांची निवड कधी ?

दरम्यान महाअधिवेशनाच्या पूर्व संधेला भाजपच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. यामुळेत आता भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार हे पक्क झालं असून फक्त औपचारीकता बाकी आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधीच भाजपच्या जिल्हाध्यक्षांची देखील निवड केली जाणार आहे. भाजपच्या 'एक व्यक्ती एक पद' या नियमानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागणार आहे.

SCROLL FOR NEXT