भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आपला आराखडा बदलण्याचे संकेत दिले असून, एकूण 6 जागांपैकी किमान 2 जागांवर महिलांना संधी देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे पक्षातील समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात बंडाळी टाळण्यासाठी अनेक इच्छुकांना विधानपरिषदेवर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता प्रत्यक्षात मर्यादित जागा उपलब्ध असल्याने फक्त 1 किंवा 2 जणांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे.
महिला आरक्षणाचा मुद्दा सध्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असल्याने भाजप या निवडणुकीत महिलांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेत आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला अडथळे आल्याच्या पार्श्वभूमीवर महिलांचा सन्मान राखण्यासाठी पक्ष आक्रमक भूमिका घेत आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी किमान एका महिलेला उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे, तर दुसऱ्या जागेवरही महिला उमेदवाराचा विचार सुरू आहे.
दुसरीकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावी कामगिरी केलेले पण अद्याप आमदार न झालेल्या काही नेत्यांनाही संधी देण्याची चर्चा आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांतील काही जिल्ह्यांमधून मजबूत दावेदार पुढे आले आहेत. प्रत्येक विभागातून 2-2 नावांवर पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याचे समजते.
तसेच जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्यावर चर्चा सुरु आहे. प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, तर उर्वरित नावांची शिफारस केंद्रीय नेतृत्वाकडे केली जाणार आहे. या निवडीमध्ये चर्चेत असलेली काही प्रमुख नावे माधवी नाईक, अर्चना पाटील चाकुरकर, रणजित सिंह निंबाळकर, राम सातपुते आणि संजय काका पाटील अशी आहेत.
या निवडणुकीत एकूण 9 जागांसाठी मतदान होणार असून त्यापैकी 5 जागा भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. मात्र इच्छुकांची संख्या 100 पेक्षा जास्त असल्याने उमेदवार निश्चित करताना पक्षनेतृत्वाला मोठी कसरत करावी लागणार आहे. नाराजी टाळणे हेही मोठे आव्हान असणार आहे.
पक्षसंघटनेत अनेक वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्यांनाही यावेळी संधी द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे. सध्या किमान 6 जण या निकषावर मजबूत दावेदार मानले जात असून त्यापैकी फक्त 1 जणाची निवड होण्याची शक्यता आहे. ग्राउंडवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना की पक्षाचे प्रवक्ते राहिलेल्यांना प्राधान्य द्यायचे, यावरही विचारमंथन सुरू आहे.
याशिवाय विभागीय आणि जातीय संतुलन राखणे हेही उमेदवारी ठरवताना महत्त्वाचे ठरणार आहे. अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडून घेतला जाणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचाही प्रभाव या प्रक्रियेत दिसून येऊ शकतो. संघाच्या शिफारशीवरून किमान 1 ते 3 नावे पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अंतिम यादीत काही अनपेक्षित बदलही होऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.