कल्याण डोंबिवली, उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरलं असून दोन्ही ठिकाणी भाजप - शिवसेना युतीचाचं महापौर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात झाली चर्चा झाली असून अधिकृत घोषणा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे लवकरच घोषणा करतील.
पुणे वरून चंद्रपूरला जाणाऱ्या होमगार्डच्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. नांदेडच्या किनवट तालुक्यातील उणकेश्वर येथे ही घटना घडली. या अपघातात 50 होमगार्ड जखमी झाले असून यातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी चंद्रपूर येथील होमगार्ड गेले होते. निवडणूक झाल्यानंतर हे होमगार्ड खाजगी ट्रॅव्हल्सने नांदेड किनवट मार्गे चंद्रपूरला परत जात होते.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकी संदर्भात महायुती करायचे असेल तर पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि पालकमंत्र्यांनी बैठक बोलवावी आम्ही त्या बैठकीला जाऊ असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले होते त्यानुसार मी जिल्ह्यातील आठही आमदार आणि दोन्ही खासदार यांना बैठकीत निमंत्रण दिलं होतं मात्र आम्हालाही आश्चर्य वाटलं भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि दोन्ही मंत्री जिल्ह्यात असून सुद्धा बैठकीला आले नाहीत. पाठीमागचा वेळचा हाच अनुभव आहे. पुढची भूमिका शिवसेना म्हणून आम्हाला घ्यावी लागेल.
राज्यातील मुंबईसह महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून शिवसेनेला मोठं यश मिळालं आहे. भाजपनंतर दुसऱ्या क्रमांचा पक्ष शिवसेना ठरला असून मुंबई महानगरपालिकेच्या महापौरावरून भाजप-शिवसेनेत रस्सी खेच होताना दिसत आहे. याचदरम्यान एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांशी हॉटेल ताजमध्ये साधला संवाद साधला आहे. तर पुढील रणनीती ठरवण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांना मार्गदर्शन केलं आहे.
राज्यात झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना रणांगणात उतरवलेच नाही.. ही माणसं निवडणुकीपासून दूर होते म्हणूनच अजित दादाची राष्ट्रवादी संपली अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.. राष्ट्रवादी ही काही ठराविक लोकांची झाली आहे त्यामुळेच ही वेळ आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा सत्कार करणार आहेत. पक्षाचे २९ नगरसेवक सध्या मुंबईतील जात हॉटेलमध्ये आहेत. तिथे शिंदे नगरसेवकांना मार्गदर्शनही करतील.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला धक्का दिला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
मुंबईचा महापौर हा महायुतीचा आणि हिंदूच होईल, असे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. तत्पूर्वी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. पराभव झाल्याचे राजकीय पक्षांनी मान्य केले पाहिजे. उद्धव ठाकरेंचा स्वभावच उद्धट आहे, त्यामुळे ते आणि त्यांचे जोडीदार संजय राऊत यांच्यामुळे मुंबई, महाराष्ट्रातून त्यांचा पक्ष संपला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईमुळे हाती असलेली मुंबई महापालिकाही त्यांच्या हातातून आता गेली आहे. त्यांनी आपल्या छोट्या भावाला दगा दिला, त्यानंतरही ते हवेत पतंग उडवत आहेत, असा टोला सोमय्या यांनी ठाकरेंना लगावला.
अहिल्यादेवी होळकर यांनी वाराणसीत मणिकर्णिका घाट बांधला होता. तो अत्यंत सुंदर असा घाट होता. पण विकासाकामांच्या नावाखाली तो पाडण्यात आला. घाट पाडायचा होता, तर पूर्वकल्पना द्यायची होती. कोणतीही पूर्वकल्पना न देता मणिकर्णिका घाट पाडण्यात आला. तेथील अहिल्यादेवींची मूर्ती लोकांच्या पायाखाली येईल, अशा पद्धतीने तेथील ठेकेदाराने काम केले आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारायचं आहे की, निवडणुकीत तुम्ही अहिल्यादेवींचं नाव घेता आणि त्यांनी बांधलेल्या वास्तूं नरेंद्र मोदी यांच्याच मतदारसंघात अशी अवस्था होत असेल तर ते मान्य नाही. त्यामुळे तुमचं हिंदुत्व पण निवडणुकीपुरतं आहे का, असा सवाल अहिल्यादेवींचं वंशज, इंदूर संस्थानचे भूषणसिंह होळकर यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवलं आहे, हे मला माहिती नाही. ते शिंदेसाहेब आहेत. शिंदे साहेबांच्या डोक्यात काय असतं, ते मला काही समजत नाही, असं विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
कोल्हापुरातील महायुतीच्या बैठकीला समरजितसिंह घाटगे यांनी हजेरी लावली आहे, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. समरजितसिंह घाटगे हे भाजपच्या महायुतीच्या ब्रॉड व्होल्डमध्ये आलेले आहेत. त्यांची प्रवेश नावाची टेक्निकल गोष्ट होईल. त्यांची आगामी वाटचाल हे आमच्यासोबत होईल. भाजपमध्ये प्रवेश करून ते पक्षाचे नेते होणार, हे प्रक्रिया होईल, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
अनेक लोकांना वाटतं मी मंत्री व्हावं, पण नुसतं वाटून होत नसतं. चंद्रपूर महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांच्या समर्थकांची समजून घालताना ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हे विधान केले आहे, त्यामुळे राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
आसाम मध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचे आभार मानले. मुंबईतील जनतेनं भाजपला प्रचंड बहुमत दिलं त्याबद्दल धन्यवाद मानत मोदींनी मुंबईतील विजयाचे कौतुक केले. हा विकासाचा विजय असल्याचं मोदी म्हणाले. पहिल्यांदाच भाजपला मुंबईत एवढं मोठ यश मिळालं आहे. तसेच महाराष्ट्रात काँग्रेस पूर्णपणे संपल्याची टीका त्यांनी केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील दर्याचे वडगावमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्मशानभूमीत भानामती करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडलं. यात एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. तर, 3 साथीदार पसार झालेत. विठ्ठल सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला टाचणी लावलेले लिंबू, गुलाल आणि फोटोंसह ही अघोरी पूजा सुरू होती. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. तसंच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी खळबळ उडाली आहे.
वाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत ते बोलतात ते वास्तव नाही असा टोला नारायण राणेंनी लगावला. उद्धव ठाकरेंनी देवाला कधी हात जोडले नाहीत असाही टोलाही त्यांनी लगावला.
भंडाऱ्याच्या भावड गावाच्या वेशीवर असलेल्या धार्मिक स्थळामधील मूर्तीची विटंबनेवरून तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी आरोपीला तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी एकनाथ शिंदे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थांनी भावड ते अड्याळ, असा 17 किमी अंतराचा मोर्चा काढला. यानंतर अड्याळ पोलिस ठाण्यासमोर पोहोचलेल्या मोर्चेकऱ्यांनी ठाण्यासमोरचं ठिय्या आंदोलन केलं. यामुळं भंडारा-पवनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यानं वाहतूक प्रभावित झाली. सध्या पोलिसांसोबत मोर्चेकरांची चर्चा सुरू असून काय तोडगा निघते, याकडे आता नजरा लागल्या आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाबरोबर युती करण्याचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात आज माजी उपमुख्यमंत्री विजयी मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आज अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं. इराणी महिला व पुरुषांनी विटा- लाकडी काठ्यांनी हल्ला केल्याची घटना खडका रोडवरील बडा खानका, मुस्लिम कॉलनी परिसरात घडली. या घटनेच्या पाश्वभूमीवर बाजारपेठ पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने सकाळी सात वाजेला कोंबिंग ऑपरेशन राबवून संयुक्त कारवाई केली. यात एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस, 16 दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता 20 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समित्यांची मुदत संपून वर्ष उलटले, तरी आरक्षणाच्या तांत्रिक मुद्द्यामुळे निवडणुका रखडल्या आहेत. 50 टक्क्यांहून अधिक आरक्षणाच्या मर्यादेवरून पेच निर्माण झाल्याने, सध्या तिथे प्रशासकराज सुरू आहे. यामुळे स्थानिक नेत्यांची राजकीय कोंडी झाली असून कार्यकर्त्यांची फळी टिकवणे आव्हानात्मक बनले आहे. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले असले, तरी 56 गटांच्या आरक्षणाचे भवितव्य अद्याप अनिश्चित आहे. आता सर्वांच्या नजरा 21 जानेवारी रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लागल्या आहेत. या निकालावरच इच्छुकांचे भवितव्य आणि जिल्ह्याची पुढील राजकीय दिशा अवलंबून असल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.
खासदार नारायण राणे यांनी महायुतीतील घटक पक्षांसोबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीसाठी यशस्वी बैठका पूर्ण केल्या आहेत, अशी माहिती दिली. सर्व कार्यकर्त्यांच्या संमतीने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. सर्व 50 जागांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीने सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.साताऱ्यातील एका हॉटेल मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडत आहेत.दोन दिवस या मुलाखती पार पडणार आहेत.विशेष म्हणजे मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखती पार पडत आहेत.
रायगड जिल्ह्यातील खोपोली इथल्या मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणातील पसार भरत भगत याला पोलिसांनी खालापूर इथून अटक केली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 16 डिसेंबरला राजकीय वैमनस्यातून हत्या झाली होती. या हत्येता आता मुख्य मारेकरऱ्यांना खोपोली पोलिसांनी अटक केली आहे. हत्येचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत फरार होते. सुधाकर घारे पसार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणतात, "एकनाथ शिंदे यांनी एका हॉटेलला तुरुंगात रूपांतरित केले आहे. जे नगरसेवक जिंकले आहेत आणि तिथे ठेवण्यात आले आहेत त्यांना ताज हॉटेलमधून सोडले पाहिजे. त्यांना भीतीपोटी ठेवण्यात येत आहे. बरेच लोक आमच्या संपर्कात आहेत. मुंबईत भाजपचा महापौर कोणाला हवा आहे? एकनाथ शिंदेंनाही हे नको आहे."
विधानसभेला मतदान न करणाऱ्यांना जाहीर सभेतून इशारा वजा धमकी दिल्या प्रकरणी शिंदेंसेने आमदार अब्दुल सत्तार यांना सिल्लोड येथील प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाने नोटीस बजावली आहे. न्यायालयात हजर राहून सत्तार यांनी आपली बाजू मांडावी, असे नोटीसीत म्हटले आहे.
शिंदेंना त्यांचे नगरसेवक भाजप फोडेल, अशी भीती आहे. त्यामुळे त्यांनी नगरसेवकांना हाॅटेलमध्ये ठेवले आहे. उपमुख्यमंत्री असलेल्या शिंदेंचे नगरसेवक सुरक्षित नाहीत.
मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूच्या वापराकरिता पथकरात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या निकालावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सामनातील सदरातून भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. या सर्व महापालिकांच्या निवडणुकीत हरामाचा पैसा वापरला आणि सत्तेतल्या तिन्ही पक्षांकडे हा पैसा होता. आणि याच भ्रष्ट पैशांवर भाजपने मुंबई अदानींच्या घशात घातली, अशा शब्दात राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला आहे. महापालिका निवडणुकीत शिंदे व त्यांच्या लोकांकडे ‘कॅश’ म्हणजे रोखीची चणचण भासली व फडणवीस यांना तेच हवे होते. हे खरे असले तरी मुंबईतील त्यांच्या उमेदवारांना प्रत्येकी 5 कोटी व इतर महानगरपालिकांत 2 कोटी देण्याची कामगिरी शिंदे यांच्या पक्षाने बजावली. मुख्यमंत्र्यांनी 40 हजार कोटींची कामे थांबवली ही शिंदे यांच्या आर्थिक उलाढालीतील लहान घटना आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही आता अमली पदार्थांच्या व्यवहाराचा पैसा पसरला आहे. याच पैशांनी ‘मतदार’ विकत घेतला जातो. हे सर्व भयंकर आहे. नशेच्या गोळ्या व नशेचा पैसा सत्ताधारी घरापर्यंत पोहोचवत आहेत. मग आता राहिले काय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
वसंतदादाचे पणतू, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव आणि खासदार विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी नगरसेवक बनले आहेत. सांगली मधील प्रभाग 11 मधून ते विजयी झाले आहेत.
काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुलला आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ते टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ मध्ये सहभागी होणार आहेत.
अमरावतीत भाजप सध्या युवा स्वाभिमान सोबत जाणार असल्याचं चित्र असलं तरी बहुमताचा आकडा 44 आहे. भाजप आणि युवा स्वाभिमानच्या जागा मिळून 40 होत आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी अजून 4 जागांची गरज आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन महापौर बसवण्याचा तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता नवी मुंबई भाजपची सत्ता आली आहे. नवी मुंबईची जबाबदारी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईकांना फोन करत त्यांचं अभिनंदन केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.